( रत्नागिरी )
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी जिल्ह्यातील २८ वर्षीय युवकाने मानसिक असंतुलनाच्या स्थितीत रत्नागिरीतील जाकादेवी परिसरातील आंब्याच्या बागेमध्ये गवत नाशक औषध प्राशन केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना २१ जून रोजी दुपारच्या सुमारास घडली असून, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
भानू प्रताप रामनिवास चौहान (वय २८, रा. बरसोला किला, ता. तूकनिया, जि. लखीमपूर खीरी, उत्तर प्रदेश) असे मयताचे नाव आहे. चौहान यांचे मानसिक संतुलन बिघडलेले असल्याची माहिती असून, त्यांनी जाकादेवी (ता. रत्नागिरी) येथील सूधीर देसाई यांच्या आंबा बागेमध्ये कोणते तरी गवत मारण्याचे औषध पिल्याचे निष्पन्न झाले. विषप्राशनाची माहिती मिळताच त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरी) उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची नोंद आमृ. क्रमांक ४९/२०२५ अन्वये बी एन एस एस कलम १९४ प्रमाणे रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे जाकादेवी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.