( रत्नागिरी / प्रतिनिधी )
आंबा घाटातील दख्खन परिसरात शनिवारी दरड कोसळून भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. दरडीच्या ढिगाऱ्यांखाली दख्खन गावाच्या नळपाणी योजनेची पाईपलाइन पूर्णपणे गाडली गेल्याने गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती, मात्र आता दरड हटवण्याचे काम पूर्ण झाले आहे.
दरड कोसळलेली जागा ही रोडच्या वरील बाजूस कटिंग केलेल्या डोंगर उताराची असून, आता या डोंगराला मोठ्या प्रमाणावर भेगा पडल्या आहेत. पावसामुळे ही माती कधीही पुन्हा खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. सिमेंटच्या नाल्यांमध्ये गाळ साचल्याने ओहोळाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे, त्यामुळे रस्त्याचीही स्थिती नाजूक झाली आहे. दरड हटवण्यासाठी रवी इन्फ्रा कंपनीचे कर्मचारी यंत्रसामग्रीसह तैनात आहेत. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी नियोजनाच्या अभावामुळे गोंधळाचे चित्र दिसून येत आहे. पावसाच्या संततधार आणि डोंगर उतारावरील अस्थिर मातीमुळे प्रशासनाची आणि ठेकेदार रवी इन्फ्रा कंपनीच्या इंजिनिअर यांची कसोटी लागली आहे.
कोकणात पावसाने हजेरी लावल्यानंतर डोंगर दरड कोसळण्याचे, रस्ते खचण्याचे आणि वाहतूक खोळंबण्याचे सत्र सुरू झाले आहे. याच पावसाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी ‘पाहणी दौरे’ केले खरे, पण या पाहणीत नेमकं पाहिलं काय? हा प्रश्न केवळ स्थानिकांचा नाही, तर प्रशासनाची जबाबदारी विचारणाऱ्या प्रत्येक सजग नागरिकाचा आहे.
प्राधिकरणाचे अधिकारी केवळ गेटबंदी पाहणीसाठी?
या सगळ्यावर लक्ष ठेवायचे, वेळेवर काम दर्जेदार होतेय का, अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केली जाते आहे का, हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता त्यांचे काम केवळ फाईल नोंदी, ठेकेदाराचे अहवाल आणि पावसात गाडी फिरवण्यापुरते मर्यादित राहिले आहे. ‘पावसात दौरा केला, फोटो काढले, पंचनामा दाखवला आणि निघून गेलो’ हा अधिकारी वर्गाचा नवा दिनक्रम बनल्याचे चित्र आहे. कोकणात काम हे पावसाला विचारात घेऊन व्हायला हवे, हे वर्षानुवर्षांचे वास्तव आहे. मात्र ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग यांचे हे कायमचे विसरलेले गणित आहे.