( मुंबई )
मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने मुंबईसह सभोवतालच्या परिसरामध्ये विश्रांती घेतली असली तरी पुढील ४ दिवस कोकणात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकण पट्टयात आणि घाटमाथ्यावरील भागांमध्येही मुसळधार पाऊस होणार असल्याचे भाकित हवामान विभागाने वर्तविले आहे. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील ४ दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, राज्यातील काही नद्यांना पूर आल्याने त्या ठिकाणावरील नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रत्नागिरीतील खेड, दापोली नगरपालिका हद्दीमध्ये अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी आल्याने काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. नाशिकमध्ये गोदावरी नदीसह अनेक नद्यांना पूर आला असून धरणांमधील जलसाठ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पावसाच्या या जोरामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला सज्ज राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पण, दुसरीकडे मात्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी तुरळक पावसाचा अनुभव येईल. त्यामुळे दैनंदिन कामकाजावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. हवामान विभागाने पुणे घाट परिसरात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, नाशिक आदी घाटमाथ्यावरील जिल्ह्यांमध्ये येत्या २३ आणि २४ जून रोजी अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या भागांतील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. काही ठिकाणी यलो अलर्टदेखील देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये २२ जूननंतर पावसाचा जोर कमी होईल. नांदेड, परभणी, हिंगोलीसह अन्य काही जिल्ह्यांत हलक्या सरींची शक्यता आहे.
पुणे, नाशिकमध्ये पावसाचा इशारा
मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, नाशिक आदी घाटमाथ्यावरील जिल्ह्यांमध्ये येत्या २३ आणि २४ जून रोजी अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या भागांतील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. काही ठिकाणी यलो अलर्टदेखील देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये २२ जूननंतर पावसाचा जोर कमी होईल. नांदेड, परभणी, हिंगोलीसह अन्य काही जिल्ह्यांत हलक्या सरींची शक्यता आहे.