(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मिन्या-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात ठेकेदाराच्या बेफिकिरीमुळे गंभीर अपघात टळता टळला. खानू-कशेळी गावच्या हद्दीतील एका ओढ्यावर नवीन पूल उभारण्याचे काम सुरू आहे. परंतु या कामात सुरक्षेच्या अत्यंत मूलभूत उपाययोजनाही करण्यात आल्या नाहीत. रवी इन्फ्रा कंपनीकडून सुरू असलेले हे काम म्हणजे केवळ रस्ता बांधण्याचा प्रकल्प नाही, तर नागरिकांचे प्राण धोक्यात घालणारा एक खुला अपायकारक प्रयोगशाळा बनला आहे.
कामासाठी ओढ्यात एक छोटा सिमेंट पाईप टाकून पाण्याचा निचरा करण्यात आला होता. मात्र, काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याचा जोर वाढला आणि पाईपमुळे पाण्याला अडथळा निर्माण झाला. परिणामी, रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ओढ्याचे पाणी सुमारे पाच ते सहा फूट उंचीवर महामार्गावर आले. या गंभीर परिस्थितीत ठेकेदाराने कोणतीही सूचना फलक, दिवे किंवा अडथळे लावलेले नव्हते. परिणामी, एका स्विफ्ट कारचालकाचा अंदाज चुकला आणि गाडी थेट ओढ्यात जाऊन पडली. त्याचवेळी एक टेम्पोही पाण्यात अडकला. सुदैवाने, इतर वाहनचालकांनी वेळीच प्रसंगावधान राखत कारमधील व्यक्तींना बाहेर काढले आणि मोठी दुर्घटना टळली.
या घटनेनंतर ओढ्याचा प्रवाह इतका वाढला की, महामार्ग पहाटे पाच वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला. इतकेच नव्हे तर, पुलाच्या कामासाठी ठेवलेले वीस फुटांचे सिमेंट गर्डरही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. या सगळ्या प्रकारातून ठेकेदाराच्या मनमानीपणाचे आणि प्रशासकीय दुर्लक्षाचे गंभीर उदाहरण समोर आले आहे. सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना न करता काम सुरू ठेवणे हे केवळ निष्काळजीपणाच नव्हे, तर नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र आहे. संबंधित यंत्रणांनी याची तात्काळ दखल घेऊन ठेकेदारावर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी प्रवासीवर्गाकडून होत आहे. नशिब बलवत्तर म्हणून जीव वाचले, पण उद्या कोण? हा प्रश्न आता या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येक वाहनचालकास भेडसावत आहे. प्रशासन आणि ठेकेदार यांच्या निष्काळजीपणाची किंमत नागरिकांच्या जीवावर उठू नये, अशी अपेक्षा देखील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
गांभीर्याने दखल घेण्याऐवजी संबंधित यंत्रणांचे डोळेझाक
गेल्या पावसाळ्यात देखील रवी इन्फ्रा कंपनीच्या कामाच्या दर्जाबाबत आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत तक्रारी आहेत. मात्र, महामार्ग प्राधिकरण विभाग किंवा जिल्हा प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नाहीत. रवी इन्फ्रा कंपनीच्या मनमानी कारभाराबाबत तक्रारी असूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने, नागरिकांमध्ये असा संशय बळावतो आहे की, स्थानिक राजकीय पुढाऱ्यांचा या ठेकेदाराला पाठिंबा आहे का? या ठेकेदार कंपनीकडून महामार्गाचे सुरू असलेल्या वेगवेगळ्या भागात अर्धवट, धोकादायक व निकृष्ट कामे केली जात आहेत. या संदर्भात बातम्या ही प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र गांभीर्याने दखल घेण्याऐवजी संबंधित यंत्रणा डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे.