( चिपळूण )
चिपळूण तालुक्यातील कुशिवडे गावात बिबट्याच्या वाढत्या संचारामुळे भीतीचे सावट पसरले आहे. बिबट्याने गेल्या काही आठवड्यांत शेळ्या, गायी, वासरे फस्त करत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. या प्रकरणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.
गावातील संतोष गोसावी व सहकाऱ्यांचा गेल्या सहा वर्षांपासून शेळीपालन व्यवसाय सुरू आहे. मात्र, मागील मे महिन्यापासून आतापर्यंत त्यांच्या चार शेळ्या बिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. तसेच सुरेंद्र शिगवण व दत्ताराम शिगवण यांच्या गाय व वासरालाही बिबट्याने लक्ष्य केले आहे.
विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी जनावरांसाठी गोठे बंदिस्त करूनही बिबट्याचे हल्ले थांबलेले नाहीत. परिणामी, पशुधनाचे सातत्याने होणारे नुकसान आणि बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ कदम यांनी वनविभागाला तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली. घटनेची माहिती मिळताच वनपाल अश्विनी जाधव, पोलिसपाटील मोहिते, पशुसंवर्धन अधिकारी, सरपंच रोशनी डिके, ग्रामपंचायत सदस्य दिलीप डिके व कर्मचारी पंडव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि शेतकऱ्यांची समजूत काढली.
तत्काळ भरपाई आणि संरक्षणाची मागणी
कुशिवडे गावातील शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे वनविभागाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी, तसेच बिबट्याच्या वावरावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ कदम यांनी केली आहे.