( अलिबाग )
पुणे आणि रायगड जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा समजला जाणारा वरंध घाट रस्ता येत्या ३० सप्टेंबरपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी घेतला आहे. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या सूचनेनुसार ही वाहतूक अधिसूचना जारी करण्यात आली असून, प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
गेल्या काही वर्षांपासून वरंध घाटात वारंवार दरडी कोसळणे, रस्ता खचणे आणि माती वाहून येणे असे प्रकार घडत असल्याने हा घाट पावसाळ्यात अत्यंत धोकादायक ठरत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने घाट मार्ग प्रवासयोग्य नसल्याचा निष्कर्ष काढत हा मार्ग तात्पुरता बंद ठेवण्याची शिफारस प्रशासनाकडे केली होती.
या बंदीचा परिणाम एसटी महामंडळाच्या बससेवा, मालवाहतूक करणारे ट्रक, तसेच हलकी खासगी वाहने यांच्यावर होणार आहे. काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून घाट दुरुस्त करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात पावसाळ्यात त्याचा काही उपयोग होत नसल्याचे चित्र समोर आले आहे. प्रवाश्यांनी आता पर्यायी मार्ग निश्चित केलेल्या मार्गांचा वापर करण्याचे प्रशासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत.
प्रवाश्यांसाठी पर्यायी मार्ग निश्चित
🔸 कोकणातून पुण्याकडे जाण्यासाठी: महाड – माणगाव – ताम्हिणी घाट – मुळशी – पुणे
🔸 कोल्हापूरकडे जाण्यासाठी: पोलादपूर – खेड – चिपळूण – पाटण – कराड – कोल्हापूर
पावसाळ्यात धोक्याची घंटा; प्रशासनाकडून खबरदारीचा पवित्रा
दरवर्षी पावसाळ्यात असलेल्या संभाव्य दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची सुरक्षितता केंद्रस्थानी ठेवत प्रशासनाने वाहतूक बंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जरी काहीसा त्रास होणार असला, तरी प्रवाशांचे प्राण वाचवणे हेच प्रमुख उद्दिष्ट असल्याची स्पष्ट भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.