(रत्नागिरी / प्रतिनिधी)
निवळी-गणपतीपुळे मार्गावरील जाकादेवी बाजारपेठेत गुरुवारी दुपारी झालेल्या अपघातात एका ६३ वर्षीय पादचाऱ्याला दुचाकीने जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. धक्कादायक बाब म्हणजे, अपघात करणाऱ्या दुचाकीवर तिघेजण बसलेले होते. या प्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुणाल राजेंद्र जाधव (वय १९, रा. बौद्धवाडी-ओरी, रत्नागिरी) असे या दुचाकीस्वाराचे नाव असून, तो एमएच-०८ बीएच-४८४७ या क्रमांकाच्या दुचाकीवर रोशन विनोद मोहिते (काजुर्ली, ता. गुहागर) आणि जिया जितेंद्र मोहिते (वरवडे, रत्नागिरी) यांना घेऊन गणपतीपुळेकडे जात होता. जाकादेवी बाजारपेठेत दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्याने पादचारी रघुनाथ पांडुरंग खापले (वय ६३, रा. देवूड, रत्नागिरी) यांना जोरदार धडक दिली. या धडकेत खापले यांच्या डोक्याला आणि डाव्या कानाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
या अपघाताची माहिती मिळताच विष्णू हरी घाणेकर (वय ४०, रा. देवूड, लावगणवाडी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ग्रामीण पोलिस अंमलदार पुढील तपास करत आहेत. अशा प्रकारच्या बेदरकार दुचाकीस्वारांमुळे रस्त्यांवरील पादचाऱ्यांचे सुरक्षेचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.