( रत्नागिरी /प्रतिनिधी )
राज्यातील वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेसमोर सध्या मोठे आव्हान उभे ठाकले असून रत्नागिरीसह महाराष्ट्रातील तब्बल ३० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या एमबीबीएस प्रवेश जागांवर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) कडक भूमिका घेतली आहे. महाविद्यालयांत आढळलेल्या गंभीर त्रुटींमुळे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशाच्या नूतनीकरणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आयोगाने बुधवारी या प्रकरणाची सुनावणी घेतली असून, येत्या चार दिवसांत अंतिम निर्णय होणार आहे.
एनएमसीच्या पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण मंडळाने महाविद्यालयांची तपासणी करताना स्व-प्रमाणित घोषणापत्रे, बायोमेट्रिक हजेरी व्यवस्थेतील उपस्थिती, क्लिनिकल निकष व पायाभूत सुविधांचा दर्जा यांचा आढावा घेतला. मात्र, अनेक महाविद्यालयांत या सगळ्याच निकषांवर गंभीर उणिवा आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे, या त्रुटी दूर करण्याचा कोणताही ठोस प्रयत्न संबंधित संस्थांनी केला नसल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले आहे.
१३ जून रोजी सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना एनएमसीने नोटीस पाठवत, संबंधित त्रुटींवर उत्तर मागवले. रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयाचाही यामध्ये समावेश असून, संस्थांनी पाठवलेले स्पष्टीकरण आयोगाच्या तपासकांना समाधानकारक वाटलेले नाही, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
राज्यातील शासकीय वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेवर हा गंभीर शेरा ठरत असून, आयोगाच्या निर्णयाची सध्या उत्सुकतेने प्रतीक्षा आहे. जर त्रुटींवर त्वरित उपाययोजना न झाल्यास, हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गडद सावट येण्याची भीती व्यक्त होत आहे.