( रत्नागिरी /प्रतिनिधी )
खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना संचित रजेवर बाहेर पडून पसार झालेल्या न्यायबंदीस तब्बल ९ महिन्यांनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने नवी मुंबईतून अटक केली आहे. चन्नाप्पा सरन्नाप्पा गंगवार (वय ३३), असे या फरार न्यायबंदीचे नाव असून, त्याचा शोध रत्नागिरी पोलिसांसमोर मोठे आव्हान बनला होता.
मार्गाव शहर पोलीस ठाण्यात २०११ साली दाखल झालेल्या गुन्ह्यात (गु.र.नं. 332/2011) भारतीय दंडविधानाच्या कलम 302 (खून), 364 (अपहरण), 201 (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत दोषी ठरलेल्या गंगवार याला गोव्याच्या कोलवाड येथील मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होती. मात्र गोव्याच्या पोलीस महासंचालकांनी ११ जुलै २०२४ ते ९ ऑगस्ट २०२४ या कालावधीत त्याला ३० दिवसांची पॅरोल मंजूर केली होती. ही रजा उपभोगून गंगवार याने पुन्हा कारागृहात हजर न होता फरार होण्याचा मार्ग पत्करला. फरार झाल्यानंतर त्याच्याविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात न्याय संहितेच्या कलम 262 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु आरोपी गंगवार मागील ९ महिन्यांपासून पोलिसांच्या हाती लागत नव्हता.
दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला गुप्त माहितीद्वारे गंगवार नवी मुंबईत लपल्याचे समजले. या माहितीच्या आधारे पथकाने दिनांक २० जून २०२५ रोजी तातडीची कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले व रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आणून पुढील कारवाईसाठी हजर केले. ही उल्लेखनीय कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वात पार पडली. कारवाईसाठी पोलीस हवालदार विजय आंबेकर, दिपराज पाटील, विवेक रसाळ आणि पो.कॉ. अतुल कांबळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.