(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील धामणी पवारवाडीमधील सुमारे ४० घरांचा मुख्य संपर्क असलेल्या असावी नदीवरील पुलाची उंची अपुरी ठरत असून, दरवर्षी पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जातो. परिणामी, दलित वस्ती असलेल्या या भागातील नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर पूल उंच करण्याची जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
धामणी पेट्रोल पंपासमोर असावी नदीवर बांधलेला हा पूल नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी अत्यावश्यक आहे. मात्र, दरवर्षी पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर हा पूल पूर्णतः पाण्याखाली जातो. त्यामुळे पवारवाडीतील नागरिकांचा संपर्क गावाशी तुटतो. विद्यार्थ्यांचे शाळेत जाणे थांबते, तर नागरिकांना जीव धोक्यात घालूनच वाहतुकीचा मार्ग शोधावा लागतो. नदीच्या पात्रात वाढलेली झाडे, वेली यामुळे प्रवाह अडवल्याने पूरस्थिती अधिक गंभीर बनते. मागील वर्षी तर नदीचे पाणी महामार्गापर्यंत पोहोचले होते आणि श्रद्धा हॉटेलसारख्या ठिकाणी पहिला मजलासुद्धा जलमय झाला होता.
हा पूल केवळ जर्जर नाही तर जीवघेणाही बनला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी धामणी पवारवाडीचे अध्यक्ष सुरेश पवार, ज्येष्ठ सल्लागार आर. बी. पवार, रमेश पवार, सागर पवार, शरद पवार, सचिव दीपक पवार, योगेश पवार, सीताराम पवार, संतोष पवार, सदाशिव पवार, निलेश पवार आदींनी केली आहे.
दरवर्षीची त्रासदायक समस्या कायमची दूर करण्यासाठी प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी ग्रामस्थांची आग्रही भूमिका आहे. पूल उंच करण्याचे काम लवकरात लवकर मार्गी लागले नाही, तर यंदाचा पावसाळा आणखी धोकादायक ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.