( विशेष /प्रतिनिधी )
“शिस्त, संवेदनशीलता आणि सेवेचा झपाटा” अशा तीन तत्त्वांवर उभे असलेले एक व्यक्तिमत्त्व सध्या जिल्हा रुग्णालयाच्या व्यवस्थापनाचा चेहरा बनले आहे. डॉ. विनोद सांगवीकर विशेष स्त्रीरोग तज्ज्ञ आणि सध्या रुग्णालयाचे अधीक्षक यांच्यावर अवघे रुग्णालय ठामपणे विसंबून आहे.
सकाळपासून रात्रीपर्यंत, कधी वॉर्डात तर कधी ऑपरेशन थिएटरमध्ये, तर कधी शिकाऊ डॉक्टरांना मार्गदर्शन करताना, डॉ. सांगवीकर यांचा उत्साह सदैव ताजातवाना असतो. गुरुवारी (दिनांक १९ जून २०२५) तर त्यांनी सात सिझेरियन शस्त्रक्रिया पार पाडल्या आणि त्यानंतरही चेहऱ्यावर किंचितही थकवा नव्हता. अधीक्षक पदासोबतच ते प्रसूती विभागाचे नेतृत्व करत असूनही, व्यवस्थापन आणि वैद्यकीय सेवा या दोन्ही आघाड्यांवर ते यशस्वीपणे काम करत आहेत. दररोज पाच-सहा स्त्रियांच्या प्रसूती या त्यांच्या कार्यशक्तीचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. वॉर्ड राउंड दरम्यानही डॉ. सांगवीकर शिकाऊ डॉक्टरांना वेळ देतात. प्रत्येक रुग्णाच्या प्रकृतीसंदर्भात मार्गदर्शन करत, ते वैद्यकीय शिक्षणाचाही दर्जा उंचावत आहेत.
महाभयंकर कोरोना काळासह नुकत्याच जयगड पोर्ट गॅस गळती प्रकरण असो किंवा निवळीतील शिक्षकांचा अपघात, किंवा अन्य प्रसंग ओढावले त्यावेळी डॉ. सांगवीकर आणि त्यांच्या टीमने संकट काळातही परिस्थितीवर नियंत्रण ठेवत, रुग्णालयाला सज्ज ठेवले. अशा अनेक प्रसंगांनी त्यांच्या कार्यशैलीचा ठसा उमटवला आहे. सामान्यांची सेवा हीच खरी इबादत मानणाऱ्या डॉ. विनोद सांगवीकर यांचे कार्य हे केवळ कौतुकास्पद नव्हे, तर प्रेरणादायी आहे. त्यांच्यासारखे डॉक्टर व्यवस्थापनात असतील, तर सरकारी रुग्णालये देखील ‘विश्वासाचं ठिकाण’ ठरू शकतात.
रुग्णालयात सेवा सुरू, पण मनुष्यबळ अपुरं
जिल्हा रुग्णालयात कार्यरत डॉक्टरांची संख्या मर्यादित असतानाही, डॉ. गिरी (स्त्रीरोगतज्ज्ञ), डॉ. घोसाळकर, डॉ. मनोहर गुरव, डॉ. विटेकर, डॉ. तेंडुलकर, डॉ. देवकर, डॉ. उगवेकर, आणि भूलतज्ज्ञ डॉ. कानगुले यांच्या समन्वयातून रुग्णसेवा सुरळीत सुरू आहे. गेल्या काही महिन्यांत रुग्णालयातील सोयी-सुविधा आणि सेवा व्यवस्थापनात सकारात्मक बदल झाले आहेत. मात्र, वाढत्या राजकीय हस्तक्षेपाची छाया कमी होणे ही काळाची गरज आहे. रुग्णालयातील डॉक्टरांची भरती आणि आवश्यक सुविधा यामध्ये राजकीय पुढाऱ्यांनी सक्रिय सहभाग घ्यायला हवा, अशी अपेक्षा आहे.
रिक्त पदांमुळे वाढतोय ताण; धोरणात्मक निर्णयाची गरज
सध्या जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले डॉक्टर सांगवीकर हे मूळ नियुक्तीच्या जागेपासून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात ‘बदलीने’ कार्यरत आहेत. यातच रुग्णालयातील डॉक्टरांसह नर्स यांची ही संख्या कमी आहे. वास्तविक अंदाजे कर्मचारी वर्ग १८ टक्क्यांपर्यंत मर्यादित आहे. अशी स्थिती दीर्घकाळ राहिली, तर डॉक्टरांवरचा कामाचा ताण अधिकच वाढत जाणार, आणि परिणामी रुग्णसेवेचा दर्जाही बाधित होण्याची शक्यता आहे. यामुळे रिक्त पदे तात्काळ भरून पूर्णवेळ, नियमित वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. डॉक्टरांची संख्या वाढल्यास प्रसूती, शस्त्रक्रिया आणि इतर विभागांत दर्जेदार, वेळेवर आणि सुसंघटित सेवा पुरवता येईल. ही बाब सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या स्तरावर गांभीर्याने मांडणे अत्यावश्यक आहे. तसेच स्थानिक पालकमंत्री यांनीही हा मुद्दा तातडीने त्यांच्या कानावर घालणे अपेक्षित आहे, जेणेकरून आरोग्य विभागात आवश्यक ते धोरणात्मक बदल घडवता येतील.
जनतेसाठी धोरणात्मक बदल घडवतील का पालकमंत्री?
जिल्हा रुग्णालयातील यंत्रणा सध्या कार्यक्षमतेने सुरू असली, तरी डॉक्टरांची कमतरता, तात्पुरत्या नियुक्त्या आणि अपुरी मनुष्यबळ यामुळे व्यवस्थेवर ताण आहे. रुग्णालयात सध्या ज्या डॉक्टरांची नेमणूक आहे त्यांना दुहेरी जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहेत. अशा वेळी आरोग्य विभागाने स्थायिक भरती करून ५० टक्के नव्हे, तर १०० टक्के वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. ही जबाबदारी केवळ आरोग्य मंत्र्यांची नव्हे, तर स्थानिक पालकमंत्र्यांचीही आहे. जिल्ह्याच्या आरोग्यसेवेला बळकटी देणाऱ्या धोरणात्मक निर्णयांसाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, आणि रत्नागिरीच्या जनतेच्या आरोग्यहक्काचे खरे रक्षण करावे, अशी जनतेतून अपेक्षा व्यक्त होत आहे.