(राजापूर)
तालुक्यातील वाटूळ बाजारपेठेतील उड्डाणपूलाच्या पूर्वेकडील बायपासच्या रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने पश्चिमेकडील बायपास मार्गाने उलट्या दिशेने आलेल्या मुंबईहून गोव्याकडे केबल मटेरियल लोड करून जाणाऱ्या कंटेनर वळवताना चालकाचा अंदाज चुकल्याने रविवारी दिनांक १६ मार्च रोजी कंटेनर पलटी होऊन मोठा अपघात झाला. मागून कोणतेही वाहन येत नसल्याने जीवितहानी टळली.
वाटूळ बाजारपेठेतील उड्डाणपूलाच्या पूर्वेकडील बायपासच्या रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने साखरपा दाभोळे भांबेड मार्गे येणारी वाहने मोठमोठे कंटेनर हे वाटूळ येथून वाहतूक करत आहेत. काही उंच असलेले कंटेनर वाटूळ येथील बोगद्यातून वाहतूक केले जातात उंच असलेल्या कंटेनरचे टप बोगद्याच्या छताला घासले जातात, त्याच्या निशान्याही दिसत आहेत. त्यामुळे बोगद्याला धोका निर्माण होऊ शकतो.
बोगद्याच्या ठिकाणी कुठलेही मार्गदर्शक फलक लावले नसल्याने ड्रायव्हर आपली वाहने मनमानी कुठल्याही दिशेने चालवत आहेत, याकडे वाहतूक नियंत्रण प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच वाटूळ उड्डाणपुलावर अशा प्रकारचे मोठे अपघात घडत आहेत. या अपघाताची माहिती मिळताच अपघात ठिकाणी येऊन उप पोलीस निरीक्षक श्री. मुबीन शेख. व महिला पोलीस सौ. लांबोरे आणि त्यांचे सहकारी यांनी पंचनामा केला. याबाबत अधीक चौकशी उपपोलीस निरीक्षक शेख करत आहेत.