(खेड)
खेड तालुक्यात आज सकाळपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून, त्याचा प्रत्यक्ष फटका सुमारगडाच्या पायथ्याशी वसलेल्या वाडीमालदे गावाला बसला. सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास वाडीमालदे रस्त्यावर दरड कोसळल्याने नांदिवली-खेड एसटी बसची वाहतूक काही काळ ठप्प झाली.
दरड कोसळल्याची माहिती मिळताच वाडीमालदे गावातील ग्रामस्थांनी कोणतीही शासकीय मदत न मिळवता तातडीने घटनास्थळी धाव घेतली. एकजूट दाखवत ग्रामस्थांनी श्रमदान करून दरडी हटवली आणि रस्ता मोकळा केला. यामुळे एसटी बसचा मार्ग सुरळीत करण्यात यश आले.
या मदतकार्यात ग्रामस्थ भार्गव तुकाराम चव्हाण (पोलीस पाटील), दिनेश रावजी चव्हाण, शाहू रावजी चव्हाण यांचे विशेष योगदान उल्लेखनीय ठरले. वाडीमालदे गावाने संकटसमयी तत्काळ मदतीला धावून जाण्याची आपली परंपरा आजही जपली आहे. गावातील या बहादुर मावळ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या या तत्परतेचे आणि सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.