(रत्नागिरी / प्रतिनिधी)
पुण्यातील इंद्रायणी नदीवरील साकव दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाला साकवांच्या सुरक्षेचा प्रश्न नव्याने जाणवू लागला असून, जिल्ह्यातील सर्व साकवांचे पुनःसर्वेक्षण करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांनी बांधकाम विभागाला दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनांना दिलेल्या सूचनेनुसार ही कारवाई सुरू झाली असली, तरी कोकणात पावसाळ्यात दरवर्षी उद्भवणारे पूर, वहाळ, आणि धोकादायक साकवांची समस्या नवीन नाही. प्रशासनाने याकडे वेळोवेळी दुर्लक्ष केल्यामुळे अनेक दुर्घटना घडत असून, ‘अपघात झाल्यानंतरच उपाययोजना’ हा जुनाच पॅटर्न यंदाही दिसून येतो.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या प्राथमिक अहवालात तब्बल ६०८ साकव दुरुस्तीपात्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये अनेक साकवांची अवस्था अत्यंत जीर्ण असून, पावसाळ्यात वाहणाऱ्या नद्या-नाल्यांवर हे साकव नागरिकांसाठी धोका ठरू शकतात. विशेषतः दुर्गम भागातील वाडीवस्त्या, विद्यार्थ्यांचा शालेय मार्ग, तसेच शेतीशी निगडित वाहतुकीसाठी हे साकव अत्यावश्यक मानले जातात. अशा स्थितीत प्रत्यक्ष दुरुस्ती आणि टिकावू उपाययोजना लवकरात लवकर न झाल्यास आणखी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, दुरुस्तीची अंतिम यादी प्रशासनाकडून लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते.
सध्या तरी साकवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असला, तरी यापुढे केवळ कागदी सर्वेक्षणापुरतेच हे प्रयत्न मर्यादित राहणार की प्रत्यक्षात काही बदल होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.