(रत्नागिरी)
पाली ते रत्नागिरी दरम्यान प्रवास करणाऱ्या कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरीकांना दररोज एस.टी.च्या अपुऱ्या सेवा आणि वेळेच्या विसंगतीमुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः सकाळी ८.३० ते ९.०० या वेळेत रत्नागिरीकडे येणाऱ्या गाड्या उपलब्ध नसल्यामुळे नोकरीसाठी आणि शैक्षणिक कारणासाठी प्रवास करणाऱ्यांचे हाल होत आहेत.
लांब पल्ल्याच्या गाड्या पाली बसस्थानकात थांबत असल्या तरी, त्यानंतर मार्गावर येणाऱ्या छोट्या थांब्यांवर त्या न थांबता सरळ रत्नागिरीला जातात. त्यामुळे मधल्या गावांतील प्रवाशांना सेवा मिळत नाही. त्यामुळे सकाळच्या वेळेत विशेष गाड्या सुरू करून दररोजच्या प्रवासात सुसूत्रता आणावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या मार्गावर प्रवास करणाऱ्या गाड्यांचे वाढते भारमान लक्षात घेता, रत्नागिरी एस.टी. आगारातील वाहतूक नियंत्रकांनी सकाळी अधिक गाड्या सुरू करण्याबाबत तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.