(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या तुरळ-कडवई रस्त्यावर नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे पुलानजीकची संरक्षण भिंत कोसळली आहे. या भिंतीवरून जाणारी विजवाहिनी उघडी पडली असून, यामुळे परिसरातील रिक्षा स्टँडलाही धोका निर्माण झाला आहे.
कोसळलेल्या भिंतीवरून तुरळ येथील नियोजित पंपासाठी वीजपुरवठा करणारी वाहिनी जात असून, यामधील खांब पावसात वाहून गेल्याने विजवाहिनी पूर्णपणे उघड्यावर आली आहे. सध्या या खांबाला तात्पुरता आधार देण्यात आला आहे, मात्र लवकरच योग्य उपाय न केल्यास तो कोसळण्याची आणि अपघात घडण्याची शक्यता आहे.
रिक्षाचालकांचा व्यवसाय धोक्यात
या ठिकाणीच गेली चार दशके तुरळ व कडवई पंचक्रोशीतील रिक्षाचालक आपला व्यवसाय करत आहेत. मात्र, जमिनीची धूप आणि जागा खचल्यास या रिक्षाचालकांच्या उदरनिर्वाहावर गदा येऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
त्वरित उपाययोजना करण्याची मागणी
सदर भागात संरक्षण भिंत तातडीने बांधून विजवाहिनी आणि रिक्षा स्टँड सुरक्षित करण्याची गरज असून, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच लोकप्रतिनिधींनी याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. या भागात पुन्हा भिंत उभारण्याची मागणी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी केली आहे.