(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंतीला तडे गेल्याचे समोर आले असून, यामुळे नागरिकांमध्ये चिंता आणि नाराजीचा सूर अधिकच गडद झाला आहे. या भिंतीचे बांधकाम अलिकडेच झाले असतानाही इतक्या लवकर त्यात तडे जाणे म्हणजे सार्वजनिक निधीचा केवळ अपव्ययच नव्हे, तर यंत्रणांच्या भ्रष्ट आणि बेजबाबदार कारभाराचे उघड उघड निदर्शक ठरत आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत ग्रामपंचायतीच्या कार्यकारी मंडळाने तातडीने बैठक बोलावली आणि सदर प्रकाराबाबत सविस्तर माहिती जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात सादर केली. मात्र याला कित्येक दिवस उलटले तरी अद्याप प्रशासकीय पातळीवर कुठलीही चौकशी सुरु न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
“घटनेनंतर” नव्हे, “घटनेपूर्वी” संवेदनशीलता अपेक्षित!
प्रशासकीय अधिकारी नेहमीप्रमाणे केवळ दुर्घटना घडल्यावरच पाहणी दौरे करतात, ही सवय आता लोकांना सहन न होण्यासारखी झाली आहे. बांधकामाच्या दर्जाची तांत्रिक तपासणी न करता केवळ फायलींवर सही करून बील पास करण्याची पद्धत तातडीने थांबवली पाहिजे. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांचे नाव आणि कंपनी काळ्या यादीत टाकल्याशिवाय या अपप्रवृत्तीला आळा बसणार नाही.
“वरदहस्त” असल्यामुळेच बिनधास्त ठेके मिळतात?
आज विकासकामांची गुणवत्ता दुय्यम ठरत असून अनेक ठेकेदारांना वरदहस्त असल्यामुळे यंत्रणा त्यांच्याकडे दुर्लक्ष करताना दिसते. हेच ठेकेदार वेळेवर काम न करता, निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून कोट्यवधींचे बील उचलतात आणि नंतर गायब होतात. “विकासकामे जनतेसाठी की ठेकेदारांच्या फायद्यासाठी?” — हा मूलभूत प्रश्न प्रशासनासमोर उभा आहे.
बांधकाम अभियंते प्रत्यक्ष हजरच नाहीत!
या सगळ्या गोंधळाचे मूळ कारण म्हणजे जबाबदारी टाळणारे अधिकारी. अनेक ठिकाणी बांधकाम अभियंते प्रत्यक्ष कामावर जातच नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत ठेकेदारांना मनमानी करण्याचा मोकळा परवाना मिळतो. लाखो रुपयांचा पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांकडून केवळ सही करून जबाबदारी झटकणे, हा प्रकार अधिक काळ सहन केला जाणार नाही, असे ग्रामस्थानी ठणकावून सांगितले आहे.
“चक्का जाम” हाच पर्याय
ग्रामस्थांमध्ये सध्या तीव्र असंतोष असून, जर तातडीने या घटनेची चौकशी व दोषींवर कारवाई झाली नाही, तर आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही. “महामार्गावर चक्का जाम” ही केवळ धमकी नसून, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जनतेचा हा शेवटचा उपाय ठरेल,” असा इशारा नागरिकांनी दिला आहे.