(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील तांबेडी ग्रामपंचायतीत सरपंच व ग्रामसेवकांनी केलेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली. विशेष म्हणजे, चौकशीची मागणी होताच ग्रामपंचायतीतील सात सदस्यांपैकी चार सदस्यांनी तडकाफडकी राजीनामे दिल्याने गावात मोठी खळबळ उडाली आहे.
ग्रामस्थ अजिंक्य ब्रीद यांनी वारंवार ग्रामपंचायतीकडे विकासकामांबाबत माहिती मागवली होती. कधी तोंडी, तर कधी माहितीच्या अधिकाराअंतर्गत अर्ज करूनही प्रत्येक वेळी दिशाभूल करणारी माहिती देण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याबाबत देवरुख येथील गटविकास अधिकारी यांनी कोणतीही दखल घेतली नसल्यामुळे ब्रीद यांनी सर्व संबंधित कागदपत्रांसह माजी खासदार विनायक राऊत यांच्याकडे तोंडी तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत राऊत यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, प्रत्यक्षात कोणतीही विकासकामे न करता त्यासाठी निधीचा खर्च झाल्याचे दिसून येते. याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या तांबेडी ग्रामसभेत देखील गावकऱ्यांनी एकमुखाने अशाच प्रकारच्या आर्थिक अनियमिततेवर ठराव मंजूर केला होता. विशेष म्हणजे या सभेत सरपंच आणि ग्रामसेवकांनी काही विकासकामांचे पैसे काढल्याचे कबूल केल्याचे सांगण्यात आले.
या पार्श्वभूमीवर चौकशीचा ठराव मंजूर होताच सौ. रिया राजेंद्र ब्रीद, सुप्रिया सुरेश सुतार, सुषमा अशोक तांबे आणि अजय सदानंद ब्रीद या चार विद्यमान सदस्यांनी आपापले पद सोडत तात्काळ राजीनामे दिले. त्यांच्या या कृतीने ग्रामपंचायतीच्या कारभारातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, “प्रकरण अंगाशी येऊ नये म्हणून हे राजीनामे देण्यात आले का?” असा सवाल आता ग्रामस्थ विचारत आहेत. या साऱ्या प्रकरणामुळे तांबेडी ग्रामपंचायतीतील कारभार चव्हाट्यावर आला असून, आता प्रशासन माजी खासदारांच्या मागणीची कितपत गांभीर्याने दखल घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.