( खेड )
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि चिरणी गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व मोहन आंब्रे (वय अंदाजे ६५) यांचे दुर्दैवी अपघातात निधन झाले. मंगळवारी दुपारी चिरणी पुलाजवळ बुलेटवरून जात असताना त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या बाईकची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली होती.
अपघातानंतर तातडीने त्यांना चिपळूण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढे रत्नागिरी आणि नंतर कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारांना प्रतिसाद न देता मंगळवारी मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मोहन आंब्रे हे शिवसेनेच्या जुन्या पिढीतील निष्ठावान, कार्यसमर्थ आणि कडव्या कार्यकर्त्यांपैकी एक म्हणून ओळखले जात होते. तालुका प्रमुख, पंचायत समितीचे उपसभापती अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या सांभाळल्या होत्या. चिरणी गावासह संपूर्ण खेड तालुक्यात त्यांचा सामाजिक व राजकीय प्रभाव होता.
त्यांच्या निधनाने खेड तालुक्यात शोककळा पसरली आहे. अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आर्मीमधून निवृत्त भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे.