(रत्नागिरी / विशेष प्रतिनिधी)
“रेल्वे स्थानक सुंदर की सिंचन प्रकल्प?” रत्नागिरीकरांमध्ये हा प्रश्न चवताळून विचारला जात आहे. कारण, एक वर्षापूर्वी सुशोभीकरणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च करून नवे बांधण्यात आलेले रेल्वेस्थानक सध्या पावसाच्या पाण्याने गळगट अवस्थेत पोहोचले आहे. स्टेशनमधून पावसाचे पाणी गळत असून छताची अवस्था ‘डागडुजीपेक्षा जास्त डाग’ अशा स्वरूपाची झाली आहे.
गेल्याच वर्षी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात उद्घाटन झाले. “हे रेल्वे स्थानक आता विमानतळाहून अधिक सुंदर बनले आहे” अशी गर्जना करणारा दावा खुद्द मंत्र्यांनी केला होता. पण, उद्घाटनाच्या अवघ्या काही दिवसांतच सीलिंगच्या प्लेट्स कोसळल्या आणि आताच पावसाने पुन्हा या ‘दर्जावान कामाचा’ फसवा मुखवटा फाडला आहे.
रेल्वे स्थानकाच्या छतावरून पाणी गळत असून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय, सध्या पार्किंगसाठी देखील शुल्क आकारण्यात येत असून सुविधा मात्र उणे-पुर्ण आहेत. कोकणात प्रवेश करताच कुठे डोंगराची माती खाली येईल, कुठे रस्ता खचेल तर घर कोसळेल या भीतीपोटी सामान्य माणूस जीव मुठीत धरून प्रवास करतोय, आणि वर भरपूर कर भरून ‘विमानतळासारखी’ ही झाकली माती भोगतोय.
एमआयडीसीने ४० कोटी रुपये, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अतिरिक्त निधी देण्यात आला असून आणखी काही कोटींची गरज भासल्यास तोही दिला जाईल, असे मंत्री महोदयांनी सांगितले होते. मग एवढ्या कोट्यवधींचा हिशेब नेमका कुठे गेला? फक्त रंगरंगोटी आणि फोटो काढण्यासाठी? की काम सुरू होतानाच दर्जा रांगेबाहेरच ठेवण्यात आला? गेल्या वर्षी सीलिंग प्लेट कोसळल्याची घटना ताजी असतानाही त्याकडे तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करण्यात आली. मात्र यंदाच्या सुरुवातीच्या पावसात पुन्हा गळती सुरू झाल्याने ठेकेदाराची निवड, कामाचा दर्जा, आणि यंत्रणांचे निरीक्षण या साऱ्याच गोष्टींवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.
….ही शरमेची बाब नाही का?
“वा! किती सुंदर स्टेशन झालंय!” असं म्हणत अनेकांनी नव्या रूपातल्या रत्नागिरी रेल्वे स्टेशनला मोबाईल कॅमेऱ्यांनी अक्षरशः भिरभिरवलं. पण आता वर्ष उलटले आणि वास्तवाने डोकं वर काढलेय. ४० कोटींचा खर्च, पण रेल्वेस्थानकात थेंबथेंब पाण्याने साचलेली दुर्दशा! एका वर्षापूर्वी मोठ्या दिमाखासह आणि माईकवर जगद्विख्यात दावे करत उद्घाटन झालेले रत्नागिरी रेल्वे स्थानक पावसाच्या पहिल्याच तडाख्यात गळून पडतेय, ही शरमेची बाब नाही का? असा संतप्त सवाल नाव न छापण्याच्या अटीवर एका नागरिकाने उपस्थित केला आहे.
नागरिकांकडून तीव्र नाराजी
प्रवासी वर्गासह रेल्वे स्थानकात येणाऱ्या नागरिकांकडून यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, “सुशोभीकरण हा शब्द आता ‘सुशोभा’ नसून ‘सुट्टी घेऊन गेलेली जबाबदारी’ वाटते आहे”, अशी भावना प्रवाशांतून व्यक्त होत आहे. तसेच रेल्वे प्रशासनाने या कामांमधून नेमका कुठे खर्च केला आणि कोणत्या ठेकेदारांनी कामे केली, याची चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. सरकारी निधीवर केलेल्या कामांमध्ये दर्जा आणि टिकाऊपणा अत्यंत महत्त्वाचा असून, फक्त डोळे दिपवणारा देखावा म्हणजे चांगले काम नव्हे, अशा संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहेत.