(गुहागर / वार्ताहर)
“वृक्ष लागवडीद्वारे पर्यावरणाचा समतोल राखत शेतकऱ्यांनी रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय, कंपोस्ट व गांडूळ खतांचा अधिकाधिक वापर करावा,” असे आवाहन गुहागर तालुक्यातील उमराठ ग्रामपंचायतीचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी केले आहे.
शेतीत भरघोस उत्पादनासाठी शेतकरी आज विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर करतात. मात्र, या सवयीचा जमिनीच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. ही बाब लक्षात घेत सरपंच आंबेकर यांनी सेंद्रिय शेतीच्या महत्त्वावर प्रकाश टाकत पर्यावरण पूरक शेतीच्या दिशेने वाटचाल करण्याची गरज अधोरेखित केली आहे.
सरपंच आंबेकर म्हणाले, पूर्वी आपल्या पुर्वजांच्या काळात शेणखत, सुकी मासळीचा टाकाऊ भाग (कुटी) यांसारख्या सेंद्रिय खतांचा वापर करूनही भरपूर उत्पादन घेतले जात असे. त्या वेळी जमिनीचा कस नैसर्गिकरीत्या टिकून राहिला होता, आणि शेतकरी समाधानी जीवन जगत होते. पण नंतरच्या काळात उत्पादन वाढविण्याच्या हव्यासापोटी रासायनिक खतांचा वापर वाढला. त्याचे दुष्परिणाम म्हणजे जमिनीचा कस कमी होणे, जलस्रोतांवर दबाव, आणि पर्यावरणाचा समतोल बिघडणे.
सेंद्रिय शेतीकडे परतण्याची वेळ
आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बी-बियाणे, आधुनिक अवजारे आणि जागरूकतेमुळे आज पुन्हा सेंद्रिय शेतीकडे शेतकरी वळत आहेत. कंपोस्ट, गांडूळ खत, शेणखत यांचा वाढता वापर दिसून येतो आहे. परिणामी, जमिनीची सुपीकता वाढत असून उत्पादनातही सकारात्मक बदल दिसून येत आहेत.
वृक्षतोड थांबवा, वृक्ष लागवड वाढवा
आंबेकर म्हणाले, “आज आपण अनेक कारणांसाठी बेसुमार वृक्षतोड करत आहोत. मात्र त्याच्या तुलनेत वृक्ष लागवडीकडे दुर्लक्ष करतो. यामुळे पाणीटंचाई, भूगर्भातील जलपातळी कमी होणे, हवामान बदल यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आपण एप्रिल-मे महिन्यात आंबे खातो, पण बी उकिरड्यावर फेकून देतो. त्या बिया गोळा करून पावसाळ्याच्या सुरुवातीला बांधावर किंवा आडीत फक्त टाकल्या तरी निसर्गाचा मोठा फायदा होतो. दरवर्षी वृक्ष लागवड करणे ही आता काळाची गरज आहे,” असे ते म्हणाले.
शासन योजनांचा लाभ घ्या
शेती व बागायतीसाठी शासनाच्या कृषी आणि वन विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेत शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा, तसेच रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय, कंपोस्ट आणि गांडूळ खतांचा वापर करून आधुनिक व टिकाऊ शेती केली, तर उत्पादनही वाढेल आणि पर्यावरणही वाचेल. शेतकरी, बागायतदार आणि ग्रामस्थांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सरपंच आंबेकर यांनी केले आहे.