(राजापूर / विनोद चव्हाण)
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कळसवली ग्रामपंचायतीचे सरपंच देवेश गोविंद तळेकर यांची “राज्यस्तरीय आदर्श सरपंच सन्मान २०२५” या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने “मान कर्तृत्वाचा… सन्मान नेतृत्वाचा” या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात, रविवार दिनांक १५ जून २०२५ रोजी, माऊली संकुल सभागृह, सावेडी रोड, अहमदनगर येथे हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सरपंच संघटीत चळवळीचे संस्थापक श्री. बाबासाहेब पावसे पाटील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
देवेश तळेकर यांनी आपल्या कार्यकाळात जलसंधारण, स्वच्छता, महिला सबलीकरण, डिजिटल ग्रामपंचायत, शालेय सुधारणा अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांनी पारदर्शकता, जबाबदारी आणि लोकसहभाग या तत्त्वांवर आधारित ग्रामविकासाचा ठोस आराखडा राबवला.
या सन्मानाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, “हा सन्मान माझा नसून संपूर्ण सहकारी आणि ग्रामस्थांचा आहे. त्यांच्या सततच्या सहकार्यामुळेच हे कार्य शक्य झाले. हा गौरव आम्हा सर्वांसाठी अधिक प्रेरणादायी ठरेल.”
या सन्मानामुळे कळसवली गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे. ग्रामस्थ, सहकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि मित्रपरिवाराकडून मा. तळेकर यांचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.