(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समिती व शिक्षण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने खंडाळा येथील दीक्षाभूमी बुद्ध विहार सभागृहात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आयु. प्रकाश रामचंद्र पवार यांनी भूषवले, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. मिलिंद कडवईकर उपस्थित होते.
समारंभात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात त्रिशरण पंचशील ग्रहणाने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत शिक्षण समितीच्या वतीने जयवंत कदम, काशिनाथ तांबे व अनिल पवार यांनी केले.
कार्यक्रमात बौद्धजन पंचायत समितीचे उपाध्यक्ष विजय आयरे, सचिव सुहास कांबळे, सहसचिव शशिकांत कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत, शिक्षण समितीचे अध्यक्ष जयवंत कदम, सचिव काशिनाथ तांबे, माजी शिक्षण विस्तार अधिकारी अनिल पवार, सामाजिक कार्यकर्त्या वकील प्रतिभा पोवार यांच्यासह समितीचे सदस्य आयु. गौतम कदम, दिनकर कांबळे, अनिल आयरे, महिला मंडळ पदाधिकारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक जयवंत कदम यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन काशिनाथ तांबे यांनी केले. प्रा. मिलिंद कडवईकर यांनी स्पर्धा परीक्षा, विद्यार्थ्यांची आवड, संधी व परिश्रम याबाबत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. वकील प्रतिभा पोवार यांनी आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश मिळवण्याचे महत्त्व पटवून दिले.
अध्यक्ष आयु. प्रकाश पवार यांनी बौद्धजन पंचायत समितीच्या समाजोपयोगी कार्याचा आढावा घेतला आणि समितीचे कामकाज माननीय आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली होत असल्याचे सांगितले. शिक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने काही विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वरूपातही बक्षिसे देण्यात आली.
गुणगौरव समारंभात बोलताना कुमारी तनिष्का पवार हिने आयोजकांचे आभार मानत विद्यार्थ्यांना मिळालेल्या प्रोत्साहनाबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी चहा व अल्पोपहाराने समारोप करण्यात आला.