( रत्नागिरी )
भारत शिक्षण मंडळाच्या नव्या वास्तूमध्ये कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरचा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात झाला. ढोल-ताशांच्या गजरात बालदोस्तांचे स्वागत, गुलाबपुष्प, चाफ्याचे फूल देऊन आणि औक्षण करून मुलांचे स्वागत, फुग्यांनी सजवलेली शाळा, पहिल्याच दिवशी पुस्तकांचे वाटप अशा वातावरण कार्यक्रम झाला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार साळवी, शाळा समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, प्रबंधक विनायक हातखंबकर, मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम यांच्यासमवेत संस्था पदाधिकारी, सदस्य, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ओम राम कृष्ण हरी हा जप सांगत मुख्याध्यापिका कदम यांनी बालदोस्तांचे आनंदाने स्वागत केले. हसत- खेळत शिक्षण देण्याची ग्वाही दिली.
संस्थाध्यक्ष साळवी म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री माझी शाळा स्पर्धेत आगाशे विद्यामंदिरने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. आता राज्यातली सर्वोत्तम शाळा करण्याकडे प्रयत्न आहे. मातृभाषा मराठी माध्यम निवडल्याने पालकांचे अभिनंदन. इथे इंग्रजीचाही सराव करून घेतो. शाळेतील शिक्षकांकडे आपुलकी असल्यानेच शाळेने मोठी प्रगती केली आहे. या वेळी डॉ. केळकर यांनीही शुभेच्छा दिल्या.
शिक्षिका सौ. गीता सावंत व शिक्षक सुधीर शिंदे यांनी मुलांकडून कृतीयुक्त गाणी म्हणून घेतली. यावेळी पालकांचेही स्वागत करण्यात आले. पहिल्या दिवशी मुलांना गोडाचा शिरा खाऊ म्हणून देण्यात आला. विद्यार्थी, पालकांसाठी सूचना दिल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी चंद्रकांत घवाळी, सतीश दळी, दादा कदम, विजय वाघमारे, श्रीराम कुष्टे आदींसह मान्यवर उपस्थित होते.