परंपरागत पद्धतीने धुमधडाक्यात विवाह करण्याची अनेक कुटुंबांची इच्छा असली, तरी आता तरुणाई अधिक सजग होत ‘खर्चिक विवाह’ टाळण्याच्या मार्गावर आहे. नोंदणी विवाहामुळे होणारी आर्थिक बचत नवदांपत्याच्या संसाराच्या उभारणीसाठी मोलाची ठरत आहे. अनेक वेळा थाटामाटात झालेले लग्न काही महिन्यांतच घटस्फोटापर्यंत पोहोचत असल्याने लग्नावर केलेला खर्च वाया जातो, असे कटु अनुभवही अनेक कुटुंबांनी घेतले आहेत.
या बदलाची नोंद विशेषतः तरुणींमध्ये घेतली जात आहे. आर्थिकदृष्ट्या बळकट नसलेल्या कुटुंबांत मुली स्वतःहून कोर्ट मॅरेजचा आग्रह धरत आहेत. आई-वडिलांवर आर्थिक ओझं नको, तसेच संसारासाठी निधी शिल्लक राहावा, या विचारातून त्या थेट विवाह नोंदणीचा मार्ग स्वीकारत आहेत. “माझं लग्न साधं असलं तरी भविष्यातील घर टिकणं अधिक महत्त्वाचं,” अशी स्पष्ट भावना अनेक तरुणींनी व्यक्त केली आहे. तसेच कुटुंबीय व समाजाचा विरोध झुगारत आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांचे प्रमाण सातत्याने वाढताना दिसत आहे.
पालकांचाही बदलत्या विचारसरणीकडे कल
पूर्वी ‘मोठं लग्न’ हीच प्रतिष्ठेची बाब मानली जायची. मात्र आता अनेक पालक देखील मुलांच्या निर्णयास पाठिंबा देताना दिसत आहेत. “लग्नात १०-१५ लाख खर्च करण्यापेक्षा तो पैसा पुढील आयुष्यासाठी वापरावा हे अधिक शहाणपणाचं आहे,” असं मत अनेक पालक व्यक्त करत आहेत. सध्याची तरुणाई ‘धुमधडाका’ नव्हे तर ‘दृढ नातं’ महत्त्वाचं मानते. “लग्न खर्च नको रे बाबा!” या विचारातून अनेक तरुण मुलंमुली थेट कोर्ट मॅरेजचा मार्ग स्वीकारत आहेत. त्यामुळे पारंपरिक समारंभिक विवाहाच्या तुलनेत नोंदणी पद्धतीला अधिक पसंती मिळताना दिसते आहे.
आजची तरुण पिढी शिक्षित, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व निर्णयक्षम आहे. यामुळेच ती पारंपरिक दबावाच्या बाहेर पडत नव्या पद्धतीचा स्वीकार करत आहे. “पूर्वी पालक जे सांगतील, तेच योग्य मानलं जायचं. आता मुलं स्वतः निर्णय घेतात आणि तो बऱ्याच वेळा योग्य ठरतो,” असं मत काही ज्येष्ठांनी मांडलं आहे .
कोर्ट मॅरेज, ज्याला सिव्हिल मॅरेज देखील म्हणतात, हे दोन व्यक्तींमधील कायदेशीर आणि औपचारिक युनियन आहे जे कायद्याच्या कोर्टात घडते. महाराष्ट्रामध्ये, भारतातील इतर राज्यांप्रमाणेच, न्यायालयीन विवाह जोडप्यांना विस्तृत समारंभ आणि धार्मिक विधींची आवश्यकता न ठेवता त्यांचे विवाह समारंभ करण्यासाठी एक सोपा आणि कार्यक्षम मार्ग प्रदान करतात. मात्र, कोर्ट मॅरेजची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही कागदपत्रे आवश्यक असतात.