(केदारनाथ)
केदारनाथ धामच्या दर्शनासाठी गेलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील जैस्वाल कुटुंबावर आज सकाळी मोठी आपत्ती ओढवली. केदारनाथ मार्गावर गौरीकुंडजवळ घडलेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत वणीचे रहिवासी राजकुमार जैस्वाल, त्यांची पत्नी श्रद्धा जैस्वाल आणि त्यांच्या दोन वर्षांच्या मुली काशी जैस्वाल यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
ही दुर्घटना आर्यन एव्हिएशनच्या बेल 407 हेलिकॉप्टरला सकाळी ५:१९ वाजता गुप्तकाशीकडे जात असताना घडली. खराब हवामान, दाट धुके आणि कमी दृश्यतेमुळे नियंत्रण सुटून हेलिकॉप्टर गौरीकुंडच्या जंगलात कोसळले, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या हेलिकॉप्टरमध्ये पाच भाविक, एक बालक आणि पायलट राजवीर सिंग चौहान हे प्रवासी होते. चौहान यांचाही या अपघातात मृत्यू झाला असून, विशेष म्हणजे ते केवळ दोन महिन्यांपूर्वी जुळ्या मुलांचे वडील झाले होते.
अपघातात जैस्वाल दाम्पत्याचा दोन वर्षांचा मुलगा विवान मात्र सुदैवाने बचावला, कारण तो त्यांच्यासोबत न जाता पांढरकवड्यात आजोबांसोबत राहिला होता. त्यामुळे जैस्वाल कुटुंबातील तो बचावला आहे.
हेलिकॉप्टरने गुप्तकाशीहून सकाळी ५:१० वाजता उड्डाण घेतले आणि ५:१८ वाजता केदारनाथ हेलिपॅडवर पोहोचले. त्यानंतर लगेचच ५:१९ वाजता परतीचे उड्डाण करत असताना दुर्घटना घडली.
या घटनेमुळे चारधाम यात्रेतील हेलिकॉप्टर सेवांच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून डीजीसीएने (DGCA) आधीच हेलिकॉप्टर उड्डाणांची संख्या कमी केली आहे आणि अधिक देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
दुर्घटनेची सखोल चौकशी एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) मार्फत केली जाणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर अशा दुर्घटना रोखण्यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने पावले उचलण्याची गरज आहे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.