(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा परिसरात उभारण्यात आलेल्या संरक्षण भिंतीला गंभीर तडे गेल्याचे समोर आले आहे. ही भिंत हजरत इशामुद्दीन दर्गाजवळ असून, ती कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहे. या प्रकारामुळे परिसरातील ग्रामस्थ, भाविक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर भिंत सुमारे १०० मीटर लांबीची असून केवळ वर्षभरापूर्वी उभारण्यात आली होती. परंतु आताच तिला मोठे तडे पडले आहेत आणि ती बाहेरच्या दिशेने झुकत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. भिंतीच्या बाजूने वाहन व पादचारी यांची वर्दळ सुरू असते, तसेच बाजूलाच राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे दररोज हजारो वाहने या मार्गावरून जातात. भिंत कोसळल्यास मोठ्या जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही.
ठेकेदारांच्या बेजबाबदारपणावर ग्रामस्थांचा रोष
गेल्या काही वर्षांपासून महामार्गाच्या कामात निकृष्ट दर्जाचे काम आणि हलगर्जीपणा वारंवार दिसून आला आहे. संपूर्ण प्रकल्पात अपघातप्रवण ठिकाणे, चुकीचे डायव्हर्जन्स, साचलेले पाणी आणि खराब रस्त्यांमुळे प्रवाशांचा त्रास वाढला आहे. स्थानिकांनी याला “ठेकेदारांना मोकळे रान मिळाले आहे” असे म्हटले आहे.
ग्रामपंचायतीकडून जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन
कुरधुंडा ग्रामपंचायतीने या धोकादायक परिस्थितीकडे लक्ष वेधत जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना लेखी पत्र दिले असून, तातडीने संरक्षण भिंतीची चौकशी करून जबाबदार ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच ही भिंत कोसळण्यापूर्वीच तातडीने संरक्षक उपाययोजना करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.
पुढील कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्ष
हा प्रकार केवळ कामाच्या दर्जावरच नव्हे तर प्रशासनाच्या उदासीनतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करतो. आता जिल्हाधिकारी या प्रकरणात कोणती भूमिका घेतात, याकडे कुरधुंडा परिसरातील ग्रामस्थ आणि प्रवाशांचे लक्ष लागून आहे.