(रत्नागिरी)
वायंगणी येथून रत्नागिरीकडे येताना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान कोल्हापूर येथे मृत्यू झाला. सिद्धेश संदीप पर्शुराम (वय २४, रा. परशुरामवाडी, देवरूख) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा अपघात ९ जून रोजी पहाटे ४.३० वाजता फणसोप परिसरात घडला होता, तर १२ जून रोजी संध्याकाळी ७.३० वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
घटनेचा तपशील:
सिद्धेश हा वायंगणी येथील एका हॉटेलमध्ये नोकरी करत होता. ९ जून रोजी पहाटे, तो कामानिमित्त दुचाकीवरून वायंगणीहून रत्नागिरीकडे निघाला होता. फणसोप गावाजवळ अचानक रस्त्यावर गुरे आडवी आली, त्याने गाडीला जोरात ब्रेक मारल्याने दुचाकीवरील ताबा सुटून ती घसरली. या घटनेत सिद्धेश रस्त्याच्या कडेला फेकला गेला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. डोक्यातून रक्तस्राव सुरू होता. तो बेशुद्धावस्थेत रस्त्याच्या कडेला आढळून आला.
दरम्यान, पावस मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी त्याला तात्काळ फणसोप प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यानंतर, नातेवाईकांनी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याला हलवले. मात्र, स्थिती गंभीर असल्यामुळे डॉक्टरांनी त्याला कोल्हापूर सीपीआर रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.
कोल्हापुरात तातडीने दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. मात्र, तीन दिवस उपचार सुरू असतानाही त्याची प्रकृती सुधारली नाही आणि अखेर १२ जून रोजी संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला. या दुःखद बातमीने देवरूख, परशुराम वाडी आणि वायंगणी परिसरात शोककळा पसरली आहे.
एक उमदा, कष्टाळू तरुण अशा दुर्दैवी पद्धतीने अकाली जाण्याने नातेवाईक, मित्रपरिवार आणि गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत.