(चिपळूण)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी महामार्ग पोलिसांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. कशेडी ते बावनदी या सुमारे १७० किलोमीटरच्या stretch वर २४ तास गस्त (पेट्रोलिंग) सुरू करण्यात आली असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या भागातील डोंगराळ व वळणदार रस्त्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.
कशेडीपासून राजापूरपर्यंतचा महामार्गाचा भाग हा दरडी कोसळणे, झाडे पडणे, रस्ता निसरडा होणे, खड्डे पडणे या समस्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. अशा अवस्थांमुळे दरवर्षी पावसाळ्यात अनेक अपघात घडतात व अनाठायी जीवितहानी होते. यंदा अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून महामार्ग विभागाने आगोदरच तयारीला सुरुवात केली असून, संबंधित सरकारी यंत्रणा व बांधकाम करणाऱ्या एजन्सींना सूचना देण्यात आल्या आहेत.
महामार्ग पोलिस उपनिरीक्षक अनंत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, “रुग्णवाहिका, जेसीबी, हायड्रा क्रेन यासारखी आपत्कालीन यंत्रणा २४ तास सज्ज ठेवण्याच्या सूचना आम्ही दिल्या आहेत. तसेच, साईड पट्ट्या, वेगमर्यादा फलक, वळवलेल्या वाहतुकीसाठी दिशादर्शक बोर्ड, अपघातप्रवण ठिकाणी डस्ट, ब्लॉक स्पॉट्सवर उपाययोजना यासाठी आवश्यक सूचना दिल्या आहेत.”
याशिवाय, पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट, नाल्यांची स्वच्छता, पाणी साचणाऱ्या ठिकाणी जलनिस्सारणाची व्यवस्था, वाळलेली व अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांची छाटणी यावरही भर देण्यात आला आहे. पावसाळ्यात वाहतूक सुरळीत राहावी आणि वाहतूककोंडी होऊ नये यासाठी सतर्क यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे.