(रत्नागिरी)
मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातग्रस्त ठिकाणी बावनदी, आंजणारी आणि वेरळ येथे वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी गतिरोधक बसवावेत, अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या प्रस्तावात केली आहे. जिल्ह्यातील अपघात निवारण समितीच्या आगामी बैठकीत या प्रस्तावावर निर्णय घेण्यात येणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर काही ठिकाणी वारंवार अपघात घडत असल्याने ही ठिकाणे अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखली जाऊ लागली आहेत. बावनदी परिसरात नुकत्याच घडलेल्या एका गंभीर अपघातात गॅस टँकरने शिक्षकांची मिनिबस धडक दिली होती. या दुर्घटनेत सुमारे ३० जण जखमी झाले होते. त्यानंतर या परिसरातील अपघातांच्या वाढत्या घटनांकडे लक्ष वेधले जात आहे.
कोकजेवठार भागातील तीव्र उतार आणि वळणांमुळे वाहनांचा वेग अधिक वाढतो. परिणामी, चालकांचा वाहनांवरील ताबा सुटतो आणि अपघात घडतात. अशा ठिकाणी गतिरोधक बसवून वेगावर नियंत्रण मिळवण्याची आवश्यकता असल्याचे महामार्ग विभागाचे म्हणणे आहे.
बावनदीसह आंजणारी व वेरळ या ठिकाणीही अपघातांचे प्रमाण लक्षणीय असून, या ठिकाणीही तत्काळ गतिरोधक बसवावेत, अशी मागणी प्रस्तावात नमूद करण्यात आली आहे. अपघात टाळण्यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे. लवकरच अपघात निवारण समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर अंतिम निर्णय होणार आहे.