(शिर्डी)
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शिर्डीच्या साई मंदिरात सुरक्षेच्या कारणास्तव फुलहार आणि प्रसाद नेण्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र, अनेक दिवसांच्या मागणीनंतर साई संस्थानने भाविकांना दिलासा देत फुलहार नेण्यास पुन्हा परवानगी दिली आहे. यासोबतच एक महत्त्वाची अटही लागू करण्यात आली आहे — भाविकांनी फुलहार विकत घेतल्याची अधिकृत पावती असणे बंधनकारक असेल.
फुलहार आणि प्रसाद नेण्यास परवानगी, पण…
मंदिरात येणारे भाविक भक्तिभावाने फुलांचे हार आणि प्रसाद घेऊन येतात. मात्र, या श्रद्धेचा गैरफायदा घेत काही विक्रेते अनधिकृतपणे अवाजवी दर आकारून भाविकांची फसवणूक करत असल्याच्या तक्रारी साई संस्थान, शिर्डी नगरपालिका आणि स्थानिक ग्रामस्थांकडून सातत्याने येत होत्या. या पार्श्वभूमीवर साई संस्थानने पुढाकार घेत भाविकांची लूट थांबवण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोणताही फुलहार किंवा प्रसाद मंदिरात नेताना त्याची अधिकृत खरेदी पावती दाखवावी लागणार आहे. पावती नसल्यास, संबंधित साहित्य मंदिरात नेण्यास परवानगी दिली जाणार नाही. या नियमाची अंमलबजावणी आजपासून (शुक्रवार) सुरू करण्यात आली आहे.
न्यायालयीन लढ्यानंतर मिळाली परवानगी
कोरोना काळात सर्वच मंदिरांमध्ये फुलहार आणि प्रसाद नेण्यावर बंदी होती. परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतरही साई मंदिरात सुरक्षेच्या कारणास्तव ही बंदी कायम ठेवण्यात आली होती. तब्बल दोन वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर अखेर मंदिरात फुलहार नेण्याची परवानगी मिळाली. मात्र, पहलगाममधील हल्ल्यानंतर पुन्हा एकदा बंदी लागू करण्यात आली होती. ही बंदी उठवण्याची मागणी फुलहार विक्रेत्यांकडून सातत्याने केली जात होती. त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवल्यामुळे, साई संस्थानने व्यापाऱ्यांच्या मागणीची दखल घेत ही अटिशय महत्त्वाची निर्णय घेतला आहे.
केवळ कर्मचारी सहकारी सोसायटीलाच विक्रीची परवानगी
उच्च न्यायालयाने साई मंदिरात नेण्यासाठी फुलहार विक्रीचा हक्क केवळ साई संस्थानच्या कर्मचारी सहकारी सोसायटीला दिला आहे. त्यामुळे आता फुलहार विक्री करताना पावती देणे या सोसायटीसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. पावती असलेल्या भाविकांनाच फुलहार मंदिरात घेऊन जाण्याची मुभा दिली जाईल. या निर्णयामुळे अनधिकृत विक्रेत्यांची अडचण वाढणार आहे. त्यांना शिर्डी नगरपालिकेने निश्चित केलेले दरच आकारावे लागतील आणि पावती देणेही आवश्यक ठरेल. संस्थानच्या या निर्णयामुळे भाविकांची होणारी लूट निश्चितच काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.