(रत्नागिरी / प्रतिनिधी)
नुकताच रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालय येथे डॉक्टरांना धमकावण्याचा प्रकार समोर आला असून त्यानंतर आता डॉक्टर, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शासकीय यंत्रणेच्या बेफिकिरीचा कळस म्हणजे रत्नागिरी जिल्हा रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असलेली एकूण 172 मंजूर पदे असताना केवळ 16 सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. एवढ्या महत्त्वाच्या आरोग्य यंत्रणेत इतकी भीषण असुरक्षितता असताना प्रशासन मात्र शांत झोपले आहे.
सुरक्षितता ही आरोग्यसेवेतील मूलभूत गरज नसून ती कायद्याने बंधनकारक आहे. मात्र रत्नागिरीत सुरक्षा रक्षकांची टंचाई ही केवळ व्यवस्थेतील दुर्लक्ष नव्हे, तर रुग्णांच्या आणि डॉक्टरांच्या जीवाशी खेळ आहे. पदे मंजूर असूनही ती रिक्त ठेवणे ही गंभीर प्रशासकीय उदासीनतेचे व व्यवस्थेचे अपयश आहे. वैद्यकीय महाविद्यालयात 48 मंजूर पदांपैकी एकही सुरक्षा रक्षक कार्यरत नाही. याचा अर्थ, शासकीय नियमांचेच सरळ उल्लंघन केले जात आहे. इतक्या मोठ्या ठिकाणी जर सुरक्षा रक्षकच नसेल, तर ही फक्त दुर्लक्षाची बाब नसून, विद्यार्थ्यांच्या आणि रुग्णांच्या सुरक्षेवर थेट गदा आणणारी बेफिकिरी आहे.
विद्यार्थी वसतिगृहात रॅगींग होणार नाही याची खात्री कोण देणार? महत्त्वाचे वैद्यकीय साहित्य चोरीला गेले तर जबाबदार कोण? डॉक्टरांना धमकावण्यासारख्या घटनांची पुनरावृत्ती झाली, तर उपाययोजना काय? एकूणच, सामान्य विद्यार्थी, महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षितता, आणि रुग्णांचे हित धोक्यात आले आहे. या निष्काळजीपणासाठी जबाबदार कोण? शासनाने पदे मंजूर केली, पण भरती प्रक्रिया का रखडली? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
धर्मशाळेचे थाटात उद्घाटन, पण सुरक्षा नाही म्हणून बंद!
काही महिन्यापूर्वी रुग्णालयात धर्मशाळा उभारण्यात आली. उद्घाटनासाठी नेते, बॅनरबाजी, फोटोसेशन सगळे मोठ्या थाटात पार पडले. पण सुरक्षा रक्षक नसल्यामुळे ती धर्मशाळा बंद ठेवावी लागली. याहून मोठी शोकांतिका कोणती?
रुग्णालयाच्या सुरक्षेचा भार 16 रक्षकांवर
जिल्हा शासकीय रुग्णालयात सध्या केवळ १६ सुरक्षा रक्षक कार्यरत असूनही, सुरक्षा व्यवस्था बऱ्यापैकी नियंत्रणात आहे, कोणताही हिंसक प्रकार, वाद, किंवा रुग्णालयाच्या परिसरात निर्माण होणारा तणावाचा प्रसंग असो कार्यरत असणारे सुरक्षा रक्षक परिस्थितीवर योग्य नियंत्रण मिळवतात. आज कार्यरत असलेल्या रक्षकांची संख्या जेमतेम असूनही त्यांनी सुरक्षा व्यवस्थेत कोठेही त्रुटी जाणवू दिलेली नाही. अत्यल्प मनुष्यबळ असूनही त्यांनी अनेक वेळा आपला अनुभव, संयम आणि धैर्याने प्रसंगावर मात केली आहे. ही प्रशासकीय अपयशाच्या पार्श्वभूमीवर उमटलेली सकारात्मक छटा म्हणावी लागेल.