(मुंबई)
कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि आनंददायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले कोकण रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे स्वप्न अखेर साकार होण्याच्या मार्गावर आहे. या कामाला आता गती मिळाली असून, भविष्यात या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या आणि सेवा दोन्ही वाढणार आहेत. कोकण रेल्वे सुरू होऊन दोन दशकांहून अधिक काळ लोटला असला तरी अजूनही मार्ग एकेरी आहे. परिणामी, गाड्यांची संख्या मर्यादित असून वेळेच्या अचूकतेवरही परिणाम होत होता. सध्या या मार्गावर दररोज सुमारे ५५ प्रवासी गाड्या आणि १७ मालगाड्या धावत आहेत. प्रवाशांची संख्या वाढलेली असून त्या तुलनेत गाड्या अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे प्रवाशांना वारंवार तिकीट आरक्षणासाठी अडचणी येतात.
नैसर्गिक अडचणींचा सामना करत कोकण रेल्वेने दुहेरीकरणाचे काम तीन टप्प्यांमध्ये हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनानुसार, सपाट भागात दुहेरीकरणासाठी प्रतिकिलोमीटर १५ ते २० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, तर बोगद्या व डोंगराळ भागात हा खर्च ८० ते १०० कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो. याआधी रोहा ते वीर या टप्प्यातील दुहेरीकरणासाठी ५३० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
दुहेरीकरणाचे तीन प्रमुख टप्पे:
-
खेड – रत्नागिरी
-
कणकवली – सावंतवाडी
-
मडगाव – ठोकुर
या तीन टप्प्यांतील कामांसाठी लवकरच सविस्तर अहवाल रेल्वे मंडळाकडे सादर करण्यात येणार आहे. योजनेस मान्यता मिळाल्यानंतर राज्य सरकारकडे निधीसाठी प्रस्ताव पाठवण्यात येईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल.
स्थानकांचा देखील होणार विकास
दुहेरीकरणासोबतच कोकण रेल्वे मार्गावरील ११ स्थानकांचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांना अधिक सोयी-सुविधा मिळाव्यात या उद्देशाने हे काम करण्यात येणार असून, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुमारे ९९ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या उपक्रमामुळे कोकण रेल्वे मार्गाची क्षमता व कार्यक्षमता वाढून प्रवाशांना अधिक सुरक्षित, जलद आणि सुलभ प्रवास अनुभवता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.