(रत्नागिरी / वार्ताहर)
“मराठी संस्कृतीची प्रतिमा, संस्कृतींच्या निष्ठेचे दर्पण… बांधूनी नात्याचे बंधन, करीन साता जन्मांचे समर्पण”—या भक्तिपूर्ण भावनेने वटपौर्णिमेचा पवित्र सण रत्नागिरीत उत्साहात साजरा करण्यात आला.
रत्नागिरीतील ‘प्रती पंढरपूर’ म्हणून ओळखले जाणारे श्री विठ्ठल मंदिर हे वटपौर्णिमा साजरी करण्याचे मुख्य ठिकाण ठरले. मंदिराच्या परिसरातील वटवृक्षाभोवती विवाहित महिलांनी पारंपरिक वेशात, हळदी-कुंकू, अक्षता, फुले, नैवेद्य अर्पण करत भावपूर्ण पूजा केली.
सुवासिनींनी सुती दोऱ्याने वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालत आपल्या पतीस दीर्घायुष्य व सात जन्मांचे नाते लाभावे यासाठी मनोभावे प्रार्थना केली. संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि सांस्कृतिक रंगाने नटलेले होते.
भारतीय संस्कृतीत वटवृक्ष हे दीर्घायुष्य, निष्ठा आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे विवाहित महिलांसाठी वटपौर्णिमा हा एक अत्यंत श्रद्धेचा दिवस मानला जातो.
फोटो :
रत्नागिरीतील ‘प्रती पंढरपूर’ श्री विठ्ठल मंदिर आवारात वटवृक्षाची भक्तिभावाने पूजा करताना महिलांचा उत्स्फूर्त सहभाग.
छायाचित्र – दिनेश पेटकर, रत्नागिरी