(नाणीज / वार्ताहर)
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर नाणीज येथील जुन्या मठाजवळ आज सोमवारी सायंकाळी सुमारे ४.१५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव रिक्षाने मागून ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन महिला प्रवासी गंभीर जखमी झाल्या आहेत.
या अपघातात रिक्षाचालक प्रकाश शांताराम कांबळे (वय ४५, रा. दाभोळे, बौद्धवाडी, ता. संगमेश्वर) यांचा मृत्यू झाला आहे. तसेच जानवी दीपक कांबळे (वय २२) आणि प्रियंका दीपक कांबळे (वय ५०, रा. दाभोळे, बौद्धवाडी) या दोघी गंभीर जखमी झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाभोळ परिसरातून रत्नागिरीच्या दिशेने जाणारी रिक्षा क्रमांक एमएच-०८ एक्यू ८८६६ ही महामार्गावरून जात असताना समोर चालणाऱ्या ट्रॅक्टरने अचानक ब्रेक लावले. ट्रॅक्टरचे टायर फुटल्यामुळे चालकाने ब्रेक दाबल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर मागून येणारी रिक्षा ट्रॅक्टरवर जोरात आदळली.
धडक इतकी भीषण होती की रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. सदर ट्रॅक्टर हा रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाच्या सुरू असलेल्या कामासाठी वापरण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.
अपघातामध्ये जखमी झालेल्या महिला प्रवाशांना जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या मोफत रुग्णवाहिका सेवेमार्फत तातडीने पाली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी येथे हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पाली दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन कांबळे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे

