(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे आणि गावखडी या दोन्ही समुद्रकिनाऱ्यांवरील संरक्षित घरट्यांतून यावर्षी तब्बल ५ हजार ३८८ कासवाच्या पिल्लांनी समुद्राच्या दिशेने यशस्वी झेप घेतली आहे. यामुळे समुद्री जैवविविधतेच्या संवर्धनाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याचे मानले जात आहे.
या वर्षी गणेशगुळे आणि गावखडी मिळून एकूण १७४ घरटी संरक्षित करण्यात आली होती. त्यापैकी गणेशगुळे येथे २१ घरटी, तर गावखडी येथे तब्बल १५३ घरटी संरक्षित करण्यात आली होती.
गणेशगुळे समुद्रकिनाऱ्यावर गेल्या तीन वर्षांपासून कासवांच्या घरट्यांचे संवर्धन सुरू आहे. यंदाही स्थानिक कासवमित्र सचिन तोडणकर यांच्या प्रयत्नातून २१ घरटी संरक्षित करण्यात आली. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये या घरट्यांतून ३८८ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. परिसर शांत व सुरक्षित असल्यामुळे कासवांच्या अंडी घालण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.
गणेशगुळेप्रमाणेच गावखडी कासव संवर्धन केंद्रातही मोठ्या प्रमाणात अंडी संरक्षित करण्यात आली. यावर्षी गावखडी येथील १५३ घरट्यांतून सुमारे ५ हजार पिल्ले सुरक्षितरीत्या समुद्रात सोडण्यात आली. कासवांच्या सुरक्षिततेसाठी स्थानिक स्वयंसेवक आणि संवर्धन कार्यकर्त्यांनी केलेले योगदान उल्लेखनीय ठरले आहे.
विणीचा हंगाम संपुष्टात
पावसाळा सुरू झाल्याने यावर्षीचा कासवांचा विणीचा हंगाम संपुष्टात आला आहे. दरवर्षी समुद्रकिनाऱ्यावरील जैवविविधतेचे जतन आणि संवर्धन हे मोठे आव्हान असते. अंडी हाताळताना येणाऱ्या अडचणींमुळे काही वेळा पिल्लांच्या विकासावर परिणाम होतो, मात्र तरीही यंदाचा प्रतिसाद समाधानकारक असल्याचे कासवमित्रांनी सांगितले.