(जैतापूर / राजन लाड)
राजापूर तालुक्यातील ऐतिहासिक घेरा यशवंतगड किल्ल्याच्या डागडुजी व दुरुस्तीचे काम सुरू असताना अवकाळी पावसामुळे एका बाजूचे बांधकाम कोसळले. ही बाब सोशल मीडियावर आणि विविध प्रसारमाध्यमांतून उजेडात आल्यानंतर, अनेक शिवप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांनी घटनास्थळाला भेट देत कामाच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
पुरातत्त्व विभाग आणि संबंधित ठेकेदाराकडून सुरू असलेल्या या बांधकामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी शिवप्रेमींनी शिष्टमंडळासह रत्नागिरी गाठले. जिल्हाधिकाऱ्यांनी आठ दिवसांत घटनास्थळाला भेट देण्याचे आश्वासन दिले असल्याचे समजते.
मात्र, सदर घटना घडून पंधरा दिवस उलटले असूनही जिल्हाधिकारी किंवा कोणताही वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी अद्याप घटनास्थळाला पोहोचलेला नाही. ही बाब विशेष चिंतेची आहे. शिवप्रेमी विनायक कदम यांनी प्रशासनाच्या या उदासीनतेवर प्रश्न उपस्थित करत विचारले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात गडकिल्ल्यांबाबत एवढी बेपर्वाई का?”
कदम यांनी पुढे म्हटले की, “घटनेनंतर जिल्हाधिकारी किंवा त्यांच्या प्रतिनिधीने तातडीने घटनास्थळाला भेट देणे आवश्यक होते. मात्र, ग्रामस्थ आणि शिवप्रेमींनाच जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन भेट घ्यावी लागत असल्याचे चित्र दुर्दैवी आणि प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचे प्रतीक आहे.”
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी आणि ऐतिहासिक वारशाचे जतन प्रामाणिकपणे व्हावे, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.