(लांजा)
लांजा शहरातील अनेक वर्षांपासून रखडलेले उड्डाणपुलाचे काम अखेर मार्गी लागत असून, मागील वर्षभरात या कामाला चांगलीच गती मिळाल्याचे चित्र दिसत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पुलावर गर्डर बसवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या दीड ते दोन वर्षांत हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात लांजा शहरातील हा उड्डाणपूल महत्त्वाचा टप्पा आहे. मात्र, अनेक वर्षांपासून या पुलाचे काम रखडल्याने स्थानिक नागरिक, व्यापारी, विद्यार्थी यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाळ्यात उडणारी धूळ आणि पावसाळ्यात चिखल-माती यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होत होते.
गेल्या दीड ते दोन वर्षांत पुलाच्या पायाभरणीपासून ते पिलर उभारणीपर्यंतची कामे पूर्ण झाली असून, आता कोर्ले फाटा ते श्रीराम पूल दरम्यान गर्डर बसवण्याचे काम सुरू आहे. संपूर्ण बाजारपेठेत अजून सुमारे ३० ते ३५ गर्डर बसवायचे बाकी आहेत. मे महिन्यात अचानक झालेल्या पावसामुळे काही दिवस हे काम थांबले होते.
या उड्डाणपुलावर एकूण ३९२ गर्डर बसवण्यात येणार आहेत. लांजा ते वाकेड या १३ किलोमीटर अंतराच्या चौपदरीकरणात लांजा शहरात संत निरंकारी सत्संग भवन ते कोर्ले फाटा दरम्यान भराव टाकण्यात येणार आहे. तसेच कोर्ले फाटा ते साटवली रोड फाटा येथे उड्डाणपूल उभारण्यात येणार असून, साटवली रोड फाटा ते एसटी डेपोदरम्यान भराव टाकून हा पूल जोडण्यात येणार आहे.
लांजा शहरातील वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने हा पूल मोलाचा ठरणार आहे. त्यामुळे या कामास अधिक गती मिळावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.