(रत्नागिरी)
शहरातील धनजीनाका परिसरातील नॉव्हेल्टी दुकानात काम करणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची धक्कादायक घटना रविवारी (८ जून) दुपारी घडली. या घटनेने रत्नागिरी शहरात खळबळ उडाली असून, अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १३७(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरुगवाडा येथील रहिवासी अलीसाहेब हसनमियों मुकादम (वय ४०, व्यवसाय – मच्छीमारी) यांची मुलगी अजबा अलीसाहेब मुकादम ही ८ जून रोजी सकाळी ९ वाजता नेहमीप्रमाणे धनजीनाका येथील नॉव्हेल्टी दुकानात कामावर गेली होती. मात्र, ती दुपारी ३ पर्यंत घरी परतली नाही.
कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू करताच दुकानमालक अनसार मेमन यांनी अजबा दुपारी २ वाजता दुकानातून निघून गेल्याची माहिती दिली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी मांडवी, भाट्ये, एस.टी. स्टँड परिसरात व नातेवाइकांकडे शोध घेतला, मात्र तिचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही.
अपहरणाचा संशय बळावल्याने अलीसाहेब मुकादम यांनी रात्री ११.३९ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
दिवसाढवळ्या अल्पवयीन मुलीचे शहराच्या मध्यवस्तीतून अपहरण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, रत्नागिरी पोलिसांकडून अजबा अलीसाहेब मुकादम हिचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. अधिक तपास सुरू आहे.