(खेड)
तालुक्यातील असगणीतील ग्रामस्थांनी हिंदुस्तान कोकाकोला कंपनीमध्ये स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्यावा, या मागणीसाठी ५ जून रोजी तोंडावर काळी पट्टी बांधून मूक मोर्चा काढला. मात्र, प्रशासनाच्या मनाई आदेशाचा भंग केल्याच्या कारणावरून या आंदोलनात सहभागी झालेल्या सरपंच, उपसरपंचांसह सुमारे ४५० ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोटे औद्योगिक वसाहतीत उभारण्यात येणाऱ्या हिंदुस्तान कोकाकोला कंपनीमुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात बाहेरून कामगार आणले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी शांततेत आणि प्रतीकात्मक पद्धतीने आंदोलन करत मूक मोर्चा काढला.
या आंदोलनात सरपंच संजना बुरटे, उपसरपंच यासिन घारे, तसेच प्रमोद चांदिवडे, चंद्रकांत गोसावी, सुवींद्र धाडवे, शाहीन कादरी, रिया बाईत, मेघना नायनाक, चेतन पवार, अनंत नायनाक, विवेक नायनाक, रवींद्र बुरटे, रविना बाईत, श्रीकांत फडकले, उस्मान झगडे, गंगाराम इप्ते, संजय मोहिते यांच्यासह सुमारे ४५० नागरिक सहभागी झाले होते.
पोलीस प्रशासनाने या मोर्चाला अनुमती नाकारल्याने आणि मनाई आदेश लागू असतानाही मोर्चा काढण्यात आल्याचा ठपका ठेवत संबंधितांवर गुन्हा नोंदवला. ग्रामस्थांच्या मागण्या, विशेषतः स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात आणि ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींवर होणाऱ्या कारवाईचा निषेध व्हावा, या हेतूने हा मोर्चा काढण्यात आला होता.
स्थानिकांवर गुन्हा दाखल झाल्याने संताप व्यक्त होत असून, या प्रकरणात पुढील कायदेशीर लढ्याची तयारी ग्रामस्थांकडून सुरू आहे.