(ठाणे)
ज्येष्ठ विचारवंत, हिंदू धर्मग्रंथांचे अभ्यासक आणि व्याख्याते दाजी पणशीकर (Daji Panashikar) यांचे शुक्रवार, ६ जून रोजी संध्याकाळी त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन कन्या, जावई, मुलगा आणि सून असा परिवार आहे.
रामायण, महाभारत तसेच संतवाङ्मयाचे सखोल अभ्यासक असलेल्या दाजी पणशीकर यांनी गेल्या पाच दशकांहून अधिक काळ विविध व्याख्याने, लेखन आणि अभ्यासातून समाजप्रबोधनाची भूमिका बजावली. त्यांच्या आजोबा वासुदेवशास्त्री पणशीकर यांच्याकडून मिळालेला धर्म, परंपरा आणि वाङ्मयाचा वारसा त्यांनी अत्यंत समर्थपणे पुढे नेला.
देश-विदेशातील विविध मंचांवर त्यांनी सुमारे अडीच हजारांहून अधिक व्याख्याने दिली. त्यांच्या व्याख्यानशैलीत गोडवा, अभ्यासपूर्ण माहिती आणि अध्यात्मिक जाण जाणवत असे, त्यामुळे त्यांना श्रोत्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. दाजी पणशीकर यांचे निधन ही शैक्षणिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी मोठी हानी आहे. त्यांनी दिलेल्या ज्ञानधनाचा ठेवा पुढील पिढ्यांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार शनिवार, ७ जून रोजी सकाळी ९.३० वाजता ठाणे पश्चिम येथील जवाहर बाग स्मशानभूमीत होणार आहेत.
दाजी पणशीकर यांचे साहित्यसंपदा:
-
अपरिचित रामायण
-
श्रीसंत एकनाथकृत आठ ग्रंथ
-
श्रीएकनाथमहाराजकृत भावार्थ रामायण (७ खंड)
-
कथामृत (भाग १ ते ६)
-
कपटनीती
-
कर्ण: खरा कोण होता?
-
महाभारत: एक सूडाचा प्रवास
भारतीय संस्कृती आणि संत वाङ्मयाचे वैभव आपल्या लेखनातून, व्याख्यानातून दृग्गोचर करणारा व्यासंगी परंपरेचा एक मोठा दुवा निखळला आहे, अशा शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ विचारवंत नरहरी विष्णूशास्री तथा दाजी पणशीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस शोकसंदेशात म्हणतात, आजन्म ग्रंथोपासक, सडेतोड मिमांसक अशा या व्रतस्थ विचारवंताचे निधन ही मोठी हानी आहे. त्यांच्या घरात अनेक पिढ्यांपासून व्यासंगाची परंपरा होती. ती त्यांनी वेदाभ्यास, सरस्वतीस्वरुप ग्रंथाचा अभ्यास यातून समर्थपणे पेलली. एकनाथी भागवत, भावार्थ रामायण ग्रंथाच्या प्रकाशानात त्यांचे मोठे योगदान राहिले. महाभारतावरील त्यांचे भाष्य गाजले. वैविध्यपूर्ण व्याख्याने, विविध लेखमाला आणि विविध विषयांवरील विपुल लेखन संपदा अशी त्यांचा व्यासंग होता. त्यांच्या निधनामुळे चौफेर व्यासंग जोपासणाऱ्या परंपरेचा व्रतस्थ असा दुवा निखळला आहे. त्यांच्या निधनामुळे शोकाकुल कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असून
ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असेही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी म्हटले आहे.