(नाशिक)
लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या कुटुंबाच्या कारला बुधवारी रात्री सुमारे 10 वाजता नाशिक–कळवण रस्त्यावर भीषण अपघात झाला. कोल्हापूर फाट्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार एका बंगल्याच्या संरक्षक भिंतीवर जाऊन आदळली. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये शैला वसंत भदाण (६२), सरला भालचंद्र भदाण (४७), चालक खालिक मेहमूद पठाण (५०, रा. नामपूर), माधवी योगेश मेतकर (३२, रा. देवळा) आणि तिची मुलगी त्रिवेणी योगेश मेतकर (४) यांचा समावेश आहे.
जखमी भालचंद्र भदाण (५२, रा. नामपूर) आणि उत्कर्ष योगेश मेतकर (१२, रा. देवळा) यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात नेत असताना उत्कर्षचा रस्त्यातच मृत्यू झाला. भालचंद्र भदाण यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृतांतील शैला भदाण व माधवी मेतकर या मायलेकी असून त्रिवेणी व उत्कर्ष ही माधवी यांची अपत्ये होती. एका कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघातानंतर तात्काळ वैद्यकीय मदत मिळाली नाही. कळवण, नांदुरी आणि कनाशी येथील 108 रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने जखमींवर उपचार विलंबाने सुरू झाले, अशी माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. वेळेवर मदत मिळाली असती, तर किमान काही जीव वाचले असते, अशी प्रतिक्रिया घटनास्थळी होती.