(मुंबई)
राजकारणात काही नात्यांना विसरणं कठीण असतं… आणि ‘ठाकरे विरुद्ध ठाकरे’ हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण. गेल्या काही आठवड्यांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येतील का, या चर्चांना जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी दिलेल्या स्पष्ट आणि थेट प्रतिक्रियेने या चर्चांना पुन्हा नवसंजीवनी दिली आहे.
“मीडियात चर्चा करून काही साध्य होणार नाही. राज आणि उद्धव ठाकरे यांनी समोरासमोर बसून थेट संवाद साधावा,” — अमित ठाकरे
पुन्हा एकत्र येण्याचे संकेत, पण प्रत्यक्षात शांतता
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत, “एकत्र येण्याचा विचार व्हावा,” असा मृदू संकेत दिला होता. त्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक सूर दाखवला होता. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेसाठी दोघांमध्ये युती होणार का? हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला. मात्र, उद्धव ठाकरे परदेश दौऱ्यावर गेल्यानंतर ही चर्चा काहीशी थंडावली. आता अमित ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा या चर्चेला उधाण आलं आहे.
“खाली कोणी बोलून उपयोग नाही” – अमित ठाकरे यांची स्पष्ट भूमिका
अमित ठाकरे म्हणाले, “कोरोना काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, राज ठाकरे यांनी स्वतः फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असंही त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे नातं अजून तुटलेलं नाही. पण आता या सगळ्यावर मीडियात बोलून काही होणार नाही. समोरासमोर संवादच यावरचा एकमेव उपाय आहे. राजकीय भांडणांवर ‘फिनिशिंग टच’ फक्त हे दोघेच देऊ शकतात,” अशीही थेट टिप्पणी त्यांनी केली.
आदित्य ठाकरे यांचा सकारात्मक सूर
या पार्श्वभूमीवर युवानेते आदित्य ठाकरे यांनीही एकत्र येण्याबाबत आशावाद व्यक्त केला. “जर कोणी मराठी माणसाच्या हितासाठी आमच्यासोबत यायला इच्छुक असेल, तर आम्ही नक्कीच त्यांना घेऊन लढायला तयार आहोत,” असे ते म्हणाले. यावर प्रतिक्रिया देताना अमित ठाकरे म्हणाले, “आदित्यकडे त्यांच्या काकांचा (राज ठाकरे) नंबर आहे, थेट फोन करायला काय हरकत आहे?” अशी मिश्कील, पण मार्मिक टिप्पणी त्यांनी केली.
नात्यांचं समीकरण महत्त्वाचं
राजकारणात युती किंवा दूरावं ‘टायमिंग’वर अवलंबून असते. सध्या राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, तर त्याचे केवळ राजकीय परिणामच नव्हे, तर भावनिक परिणामही मोठ्या प्रमाणात दिसून येतील. राजकीय जाणकारांचे निरीक्षण आहे की, “सत्तेच्या गणितापेक्षा नात्यांचं समीकरण जुळलं, तरच ठाकरे पुन्हा एकत्र येऊ शकतात.” राज आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? की ही चर्चा ‘गाजलेली पण अधुरी राहिलेली गोष्ट’ ठरणार? याचे उत्तर आगामी काही दिवसांत स्पष्ट होईल, पण ही चर्चा आता पुन्हा केंद्रस्थानी आली आहे, एवढ मात्र नक्की!