(संगमेश्वर / प्रतिनिधी)
पहिल्या पावसाच्या सरी बरसताच संगमेश्वर तालुक्यातील सडे, ओढे आणि नाले तरुणांनी गजबजले आहेत. चढणीचे मासे पकडण्यासाठी तरुणांची लगबग सुरू झाली असून पारंपरिक मासेमारीचे दृश्य पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभे राहत आहे.
इथले जीवनमान म्हणजे केवळ अधिवास नव्हे, तर निसर्गाशी निर्माण झालेलं एक सहजीवनच आहे. शेती, पाणी आणि अन्नाच्या गरजा भागवताना माणूस, प्राणी, पक्षी आणि निसर्ग यांच्यातील नातं इथे ठळकपणे जाणवतं.
पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक प्रकारचे रानमेवे, रानभाज्या जसे की भारंगी, टाकळा, फोडशी, पायरी गोळा करण्यासाठी तसेच शेतीच्या कामांकरिता लोक सड्यांवर गर्दी करत असतात. त्यातच रात्रीच्या वेळी मासे आणि खेकडे पकडण्यासाठीही अनेकजण बाहेर पडतात.
पारंपरिक मासेमारीसाठी “बांधण” ही एक खास पद्धत वापरली जाते. यामध्ये मळ्याचे मासे म्हणजेच अंडी सोडण्यासाठी पाण्याच्या उलट प्रवाहात वर चढणारे मासे पकडले जातात. हे मासे रंगाने काळे, नेटक्या आकाराचे आणि चवीलाही अत्यंत चविष्ट असतात. त्यामुळे पहिल्या पावसात पकडलेल्या या मास्यांना बाजारात मोठी मागणी असते.
या माशांना पकडण्यासाठी वेगवेगळ्या पारंपरिक पद्धती वापरल्या जातात. मोठ्या पावसात बहुतेक बांधणी वाहून जात असल्याने सुरुवातीच्या सरींत मिळणारे मासे अधिक महत्त्वाचे मानले जातात. अशा वेळी बांधणीत पकडलेल्या माशांच्या विक्रीसाठी अक्षरशः झुंबड उडते.
या चढणीच्या मासेमारीमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला हातभार लागतोच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे गावकऱ्यांचे निसर्गाशी असलेले नातं आजही तितक्याच प्रेमाने जपले जात आहे.