( राजापूर )
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने पहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले. दहशतवादाच्या समुळ उच्चाटनाच्या उद्देशाने पंतप्रधान मोदी आज जागतिक स्तरावर प्रभावीपणे नेतृत्व करत आहेत. या पार्श्वभूमीवर “राष्ट्रहिताचा विचार करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला भाजपा विचारधारेत सामील करण्याचे” आवाहन भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण यांनी केले.
राजापूर येथे आयोजित भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, “भारत सध्या विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. देशाची अर्थव्यवस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक बळकट व्हावी, यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. या वाटचालीत प्रत्येक कार्यकर्त्याने समाजालाही सोबत घेतले पाहिजे.”
तिरंगा रॅलीद्वारे एकतेचा संदेश
पहेलगाम हल्ल्यानंतर देशभर तिरंगा रॅली काढून भारतीय सैन्याला पाठिंबा दर्शवण्यात आला. यामुळे भारताच्या एकतेचा संदेश संपूर्ण जगाला मिळाला, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या अकरा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. ही प्रगती आणि सरकारच्या विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याने घेतली पाहिजे, असेही चव्हाण म्हणाले.
‘संकल्प ते सिद्धी’ उपक्रमावर भर
५ जून ते १५ ऑगस्ट या काळात राबविण्यात येणाऱ्या ‘संकल्प ते सिद्धी’ या विशेष उपक्रमांतर्गत पक्षाने केलेल्या कामगिरीचा प्रसार समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात देश आणि राज्य विकासाच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करत आहेत. या विकास यात्रेमध्ये सामान्य जनतेलाही सहभागी करून घेणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे.”