( दापोली )
दापोली तालुक्यातील जालगाव गावचे सुपुत्र, पर्यावरणप्रेमी आणि ज्येष्ठ पत्रकार श्री. प्रशांत परांजपे यांना पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल कोलंबो विद्यापीठाच्या वतीने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. पुण्यात १ जून २०२५ रोजी पार पडलेल्या विशेष समारंभात त्यांना हा सन्मान बहाल करण्यात आला.
श्री. परांजपे हे २००१ सालापासून पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत आहेत. ‘केल्याने होत आहे रे’ या समर्थ विचारधारेने प्रेरित होऊन त्यांनी अनेक नावीन्यपूर्ण आणि शाश्वत उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या कार्यामध्ये एक रोप दोन खड्डे, मातीविरहित मचाण शेती, पालापाचोळ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती, इ-वेस्टपासून स्वागत कक्ष, प्लास्टिक बाटल्यांपासून बाकडी, स्टूल व हँगिंग्स, इको-फ्रेंडली गुढी, सागरपाण्यातून हरितक्रांती, घरच्या घरी ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती, वृक्ष वाढदिवस, वणवा-मुक्त गाव योजना, पाझर खड्डे व जलतरणांद्वारे जलसंधारण, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती आदी अनेक संकल्पना यशस्वीपणे प्रत्यक्षात उतरवल्या आहेत.
श्री. परांजपे यांनी ‘निवेदिता प्रतिष्ठान’ या पर्यावरण संस्थेच्या माध्यमातून राज्यभर कार्याचा विस्तार केला आहे. सध्या ते रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या जलसंपदा विभागात जलप्रेमी या पदावर कार्यरत आहेत. २०१२ पासून जलशक्ती अभियान व पाणी आणि स्वच्छता मिशन या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतींना मार्गदर्शन करत आहेत.
फेडरेशन महाराष्ट्र राज्य पर्यावरण संस्था या राज्यस्तरीय संघटनेचे ते प्रमुख समन्वयक आहेत. त्यांनी ‘सुगंध वसुंधरा रक्षणाचा’ हे पर्यावरणविषयक पुस्तक लिहिले असून, विविध दैनिके व मासिकांमधून ते नियमित स्तंभलेखन करतात. ग्रामपंचायत जालगाव येथे ‘माझी वसुंधरा अभियानाचे’ प्रमुख म्हणून त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत आजवर त्यांना विविध राज्य व जिल्हास्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
कोलंबो विद्यापीठाने त्यांच्या दीर्घकालीन आणि अभिनव पर्यावरण कार्याची दखल घेऊन त्यांना ही मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली आहे, ही तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे.