(खोपोली)
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर जनावरांची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती गोरक्षकांनी खालापूर पोलिसांना दिल्यानंतर, पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली टोल नाका हद्दीत सापळा रचून चार टेम्पो पकडण्यात आले. या टेम्पोंमध्ये प्रत्येकी २० अशा एकूण ८० म्हशी निर्दयपणे कोंबून भरण्यात आल्या होत्या. हे सर्व टेम्पो कल्याणकडे जात असताना पोलिसांनी कारवाई केली.
दरम्यान, या दाटीवाटीच्या वाहतुकीमुळे १२ म्हशींचा प्रवासादरम्यान मृत्यू झाल्याचे उघड झाले. गोरक्षकांकडून मिळालेल्या माहितीवरून संशयित टेम्पोंना खालापूर टोलनाक्यावर थांबवण्यात आले. टेम्पो बाजूला घेतल्यावर पोलिसांनी चालकाला टेम्पोमध्ये काय आहे, याची विचारणा केली असता त्याने म्हशी असल्याचे सांगितले. टेम्पोचा पडदा उघडून पाहणी केली असता चारा, पाणी आणि हवेशिवाय अत्यंत अस्वस्थ वाईट अवस्थेत म्हशींना बांधून ठेवलेले आढळून आले.
चालकाकडे जनावरांच्या खरेदीची कागदपत्रे मागवली असता, त्यांनी वडगांव शेती उत्पन्न बाजार समिती (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील पावत्या दाखविल्या. ही जनावरे कल्याण येथील मोहम्मद वशीम कुरेशी आणि आक्रम अब्दुलगणी सय्यद यांनी खरेदी केल्याचे स्पष्ट झाले. मात्र, या वाहतुकीसाठी आरटीओ किंवा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची कोणतीही अधिकृत परवानगी घेतलेली नव्हती.
या प्रकरणी खालील आरोपींविरोधात प्राण्यांशी क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध करणाऱ्या अधिनियम १९६० अंतर्गत तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
-
करीम कलीम कोशी (२८, रा. गोवंडी, शिवाजीनगर, मुंबई)
-
हिदायत शहदाय अब्बास सय्यद (४८, रा. गोवंडी, मुंबई)
-
फरान आस्लम आलवी (३०, रा. गोवंडी, मुंबई)
-
रेहान आस्लम आलवी (२४, रा. गोवंडी, मुंबई)
-
प्रताप भिका चव्हाण (६०, रा. टाटानगर, गोवंडी)
-
बबन बाळाराम कांबळे (६०, रा. सावरडे, ता. हातकणंगले, कोल्हापूर)
-
रमजान छेटु खान (५१, रा. टाटानगर, गोवंडी, मुंबई)
या प्रकरणाचा पुढील तपास खालापूर पोलिस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.