(चिपळूण)
चिपळूण तालुक्यातील ३९ प्राथमिक शाळांच्या इमारती धोकादायक स्थितीत आढळून आल्या असून, यापैकी केवळ २५ शाळांच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाने परवानगी दिली आहे. उर्वरित १४ शाळांतील विद्यार्थ्यांचे काय, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
शहर व ग्रामीण भागांतील अनेक शाळा काळाच्या ओघात जीर्णावस्थेत पोहोचल्या असून, त्या इमारतीत शिक्षण घेणे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्यासारखे ठरत आहे. काही ठिकाणी परिस्थिती इतकी बिकट आहे की, शाळा खासगी इमारतीत भरवावी लागत आहे; तर काही ठिकाणी गळती थांबवण्यासाठी छतावर प्लास्टिकचे आडोसे टाकण्यात येत आहेत.
गोवळकोट, गोंधळे, चिवेली अशा गावांतील शाळा विशेषतः धोकादायक स्थितीत असून, पालकांनाही मुलांना शाळेत पाठविण्याची भीती वाटत आहे. या पार्श्वभूमीवर शाळांच्या दुरुस्तीची मागणी सातत्याने करण्यात येत होती. अखेर जिल्हा नियोजन समितीने २५ शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर केला आहे. मात्र उर्वरित १४ शाळांसाठी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
शाळांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता टिकवण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही प्रशासनाचीच आहे, त्यामुळे उर्वरित शाळांबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज शिक्षणप्रेमी व्यक्त करत आहेत.