(संगमेश्वर)
तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था, ढासळती संरचना व वारंवार खंडित होणारी वीज यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून, या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी शृंगारपूरचे सरपंच विनोद उर्फ बाबू भिकाजी पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात त्यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील रस्त्यांची परिस्थिती अतिवृष्टीमुळे अत्यंत गंभीर बनल्याचे नमूद केले आहे. विशेषतः संगमेश्वर डेपो ते शास्त्रीपूल दरम्यानचा सुमारे दोन किलोमीटरचा रस्ता खराब अवस्थेत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. अपुऱ्या देखरेखीमुळे वाहतूक कोंडी होत असून, अत्यावश्यक सेवा अडचणीत येत आहेत.
शास्त्रीपूल ते नायरी, तिवरे, शृंगारपूर, कातुर्डी कोंड, निवळी, नेरदवाडी या ग्रामीण मार्गांवरही रस्त्यांची व संरक्षक भिंती, गटारांची स्थिती अधिकच बिकट झाल्याचे पवार यांनी निदर्शनास आणून दिले. या भागांत पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने अपघात किंवा रस्ते खचण्याची शक्यता असून संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच, वीज खांब खोल गेले असून वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. त्यामुळे नागरिकांना अंधारात राहावे लागत असल्याची तक्रारही त्यांनी निवेदनात मांडली आहे.
या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. संबंधित ठेकेदार व अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामांची सद्यस्थिती तपासावी आणि योग्य ती दुरुस्ती त्वरीत करावी, अशी स्पष्ट अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
सरपंच पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी या भागाचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी करावी, जेणेकरून भविष्यातील आपत्ती टाळता येईल आणि नागरिकांचे जीवित सुरक्षित राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.