(चिपळूण)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मौजे असुर्डे (मनवेवाडी) येथे विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या कायमस्वरूपी व्यवस्थेसाठी गेल्या काही काळापासून ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवर्ग तसेच श्री महालक्ष्मी ग्रामविकास मंडळ मुंबई यांच्या वतीने पाठपुरावा सुरू होता.
गावचे सरपंच श्री. प्रदीप शिंदे व प्रभाग सदस्य श्री. अशोक तांबे यांच्याकडे ही मागणी करण्यात आली होती. विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सरपंच श्री. शिंदे यांनी पंचायत समितीकडे पत्रव्यवहार करून या मागणीचा पाठपुरावा केला.
यावर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. भरत चौगुले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पाणी टंचाई विभागामार्फत निधी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली.
या उपक्रमाअंतर्गत गुरुवार दिनांक २९ मे २०२५ रोजी सकाळी, शाळेतील शिक्षक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सरपंच श्री. प्रदीप शिंदे यांच्या हस्ते बोअरवेलच्या कामाला औपचारिक सुरुवात करण्यात आली. या कामाच्या मंजुरीसाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
श्री महालक्ष्मी ग्रामविकास मंडळ, मुंबई तसेच ग्रामस्थांच्या वतीने श्री. भरत चौगुले, श्री. सुभाष मोरे व इतर सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.